Published on Nov 13, 2020 Commentaries 0 Hours ago

भारतीय व्यक्ती दिवसातील सात टक्के वेळ कार्यालयात जाण्यासाठी प्रवासात खर्च करतो. शहरांमध्ये ‘फ्लेक्झिबल वर्क स्पेस’चे जाळे निर्माण झाल्यास हा वेळ वाचू शकतो.

नव्या कार्यसंस्कृतीसाठी सज्ज व्हा

कोरोना महासाथीच्या सुरुवातीच्या काळात भारतातील वर्क फ्रॉम होम कार्यपद्धतीमुळे उत्पादनक्षमतेत वाढ झाल्याच्या बातम्या आल्या. तसेच कर्मचार्‍यांना घरगुती आणि कार्यालयीन कामकाजात अधिक संतुलनाची भावना निर्माण, झाल्याचेही बोलले गेले. पण जसजसा काळ जाऊ लागला तसे, मानसिक आरोग्याच्या समस्या आणि इतर अनेक आव्हाने समोर आली आहेत. यात नोकरी किंवा रोजगाराची जागा हेही मोठे आव्हान आहे.

कोचीमध्ये असलेल्या एका स्वयंसेवी संस्थेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, बहुतेक लोकांकडून कार्यालयीन कामपेक्षा ‘वर्क फ्रॉम होम’ अधिक तणावपूर्ण असल्याचे मत नोंदवले. कंपन्यांनी कर्मचार्‍यांचा विचार करून बनवलेली ‘वर्क फ्रॉम होम’ संदर्भातील धोरणे विकसित केली जावीत, असे मत तब्बल ८७ टक्के लोकांनी मांडले.

अधिक काळ संगणकासमोर काम, अस्ताव्यस्त बसण्याची स्थिती आणि सामाजिक संवादाचा अभाव यामुळे  आरोग्यविषयक समस्या उद्भवल्या आहेत. अशा बैठ्या कार्यपद्धतींमुळे ताणतणावांत वाढ होऊन आरोग्यावर परिणाम होत असल्याचे आढळून आले आहे. कोरोना महासाथीला सुरुवात होण्याच्याही आधी जाहीर करण्यात आलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या एका अहवालात ब्रिटनमधील लोकांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य कमालीचे घटले असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती. कामाच्या जागी येणारा ताण, नैराश्य आणि चिंता यामुळे दरवर्षी १०० दशलक्ष डॉलरपर्यंत तोटा होऊ शकतो, असेही अहवालात नमूद केले आहे.

या साऱ्याचा विचार करता ‘वर्क फ्रॉम होम’ ऐवजी ‘फ्लेक्झिबल वर्क स्पेस’ हा पर्याय अजमावून पाहायला हवा. काही व्यवस्थापकांना नियुक्त करून, विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे आवश्यक आहे. काम आणि मनोरंजनातील संतुलन कायम राखण्याचा प्रयत्न त्यातून होईल. ‘फ्लेक्झिबल वर्क स्पेस’ क्षेत्रांची आखणी सहकार्याने कार्य करण्याचे वातावरण सुनिश्चित करते आणि नेटवर्किंग आणि ज्ञान-सामायिकरणसाठी (नॉलेज शेअरिंग) परिस्थिती सुलभ करते.

बर्‍याचदा मौल्यवान व्यवसाय सल्ला आणि संभाव्य व्यवसायाच्या संधी या जागांमधील सदस्यांची प्रगती सुलभ करतात. नुकत्याच झालेल्या ‘वुई वर्क’ आणि ‘ओआरएफ’ यांच्या संयुक्त अभ्यासातून हे दिसून आले आहे की, या ठिकाणाहून काम करणारे सहकारी तुलनेने कामाबाबत समाधानी आहेत, काम आणि आयुष्यातील संतुलन अनुभवतात आणि त्यांच्या भविष्यातील संधींबद्दल आशावादी आहेत.

‘फ्लेक्झिबल वर्क स्पेस’ विविधता आणि सर्वसमावेशकतेच्या संस्कृतीस जपते. ‘वुई वर्क’ आणि ‘ओआरएफ’ यांनी केलेल्या संयुक्त अभ्यासानुसार, ‘फ्लेक्झिबल वर्क स्पेस’मधून काम कणारे बहुतांश युवा पिढीतील आहेत. आणि एकूण श्रमशक्तीच्या (२६ टक्के) तुलनेत महिला कामगारांची संख्या जास्त (३९ टक्के) आहे. भारतीय महिलांकरिता ‘फ्लेक्झिबल वर्क स्पेस’चे लाभ जाणून घेण्यासाठी अशा कार्यक्षेत्रांच्या व्यवहार्यतेचे मूल्यांकन करणेही आवश्यक आहे. महिला कर्मचारी सध्या घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही जबाबदाऱ्यांचा भार उचलत आहेत. तसेच ‘वर्क प्रॉम होम’मुळे त्यांच्यावरील कौटुंबिक अवलंबन वाढले आहे. ‘फ्लेक्झिबल वर्क स्पेस’ कार्यक्षेत्राची या महिलांना कुटुंब आणि कार्यालयीन कामातील संतुलन राखण्यास मदत होते.

प्रवासातील वेळ कमी करण्याच्या दृष्टीने शहरातील व्यवसाय आणि उद्योगांना या जागांचा वापर करता येऊ शकतो. मोठ्या शहरांमध्ये या सुविधेचा आणखी मोठा फायदा आहे. प्रवासाचा वेळ सत्कारणी लावता येईल. इतर देशातील मोठ्या शहरांच्या तुलनेत भारतातील मोठ्या शहरातील व्यक्तीला आपल्या कार्यक्षेत्रापर्यंत पोहोचण्यास सर्वसाधरणतः दोन तास प्रवास करावा लागतो.

‘मूव्हइन्स इन’च्या अहवालानुसार भारतीय व्यक्ती दिवसातील सात टक्के वेळ कार्यालयात जाण्यासाठी प्रवासात खर्च करतो. शहरांमध्ये फ्लेक्झिबल वर्क स्पेस कार्यक्षेत्राचे जाळे निर्माण झाल्यास कुठल्याही कानाकोपऱ्यात वास्तव्य करणाऱ्या प्रतिभावंत कर्मचाऱ्याची नियुक्ती करणे सोपे होते. तसेच, मुंबई, बंगळुरू आणि दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये सरासरी घरभाडे भरमसाठ असल्याने रिमोट वर्किंगमुळे कर्मचार्‍यांना महानगरांपेक्षा परवडणा-या शहरांकडे जाऊन दैनंदिन खर्च कमी करण्यास मदत होईल.

‘फ्लेक्झिबल वर्क स्पेस’ कार्यक्षेत्रांकडे जाण्याचा आणखी एक मोठा फायदा शहरी पायाभूत सुविधांच्या विकासाशीही संबंधित आहे. शहरांमध्येलोकसंख्या वेगाने वाढत असल्याने, आपली शहरे, विशेषतः मध्यवर्ती व्यवसाय असलेल्या जिल्हा क्षेत्रे (सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट) गजबजली आहेत. ही गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने विचार होणे अत्यंत गरजेचे आहे. ‘स्मार्ट सिटी’ मॉडेलच्या धर्तीवर ‘फ्लेक्झिबल वर्क स्पेस’ कार्यक्षेत्र सुलभ प्रवास, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची उपलब्धता आणि विश्वासार्ह स्वच्छतेच्यासुविधा हाती देऊ शकतात. स्थानिक भागात कार्यालयीन जागांची सुविधा पुरवून, शहरांमध्ये निर्माण होणाऱ्या वाढती वाहतूककोंडी आणि प्रदूषणाच्या समस्या ‘फ्लेक्झिबल वर्क स्पेस’ कार्यक्षेत्र सोडवतील.

उपलब्ध आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये स्वमालकीच्या गाड्यांची संख्या २०१५च्या तुलनेत २०१७ मध्ये २७ टक्क्यांनी वाढली. तर त्याच काळात मुंबईत मालकीच्या मोटारींच्या संख्येत २१.८ टक्क्यांनी आणि बंगळुरूमध्ये १० टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. याचाच अर्थ असा की, महानगरांच्या रस्त्यांवर वाहनांची अलोट गर्दी होत आहे. परिणामी या महानगरांमधील वायू आणि ध्वनि प्रदूषणाच्या सर्व पातळ्या सोडल्या जात आहेत.

‘फ्लेक्झिबल वर्क स्पेस’च्या वापरामुळे भारतीय शहरे विस्कळीत होण्यापासून वाचतील, तसेच रहदारीत वाया जाणारा वेळ कमी होईल. महानगरांमध्ये काम करण्याचा अनुभव असलेले अनेक नोकरदार हे नक्कीच मान्य करतील. काही अहवालांच्या माध्यमातून असे दिसून आले आहे की, बंगळुरूचा रहिवासी दरवर्षी सरासरी २४३ तास वाहतुकीत घालवतो.

इंग्रजी म्हणीप्रमाणे वेळ म्हणजेच पैसा असेल तर अशा पद्धतीने वेळ वाया जाणे योग्य नाही. भारतातील वाढत्या जिग मनुष्यबळाच्या दृष्टीनेही ‘फ्लेक्झिबल वर्क स्पेस’ उपयुक्त ठरतील. व्यावसायिकांची वाढती संख्या आणि विशेषतः तरुण कुशल व्यावसायिक मुक्त आणि लहान प्रकल्पांत सहभागी होणे पसंत करतात. जागतिक ऑनलाइन गिग अर्थव्यवस्थेतच्या तुलनेतभारतीय मुक्त व्यावसायिकांचे प्रमाण २४ टक्के आहे. या व्यावसायिकांच्या कार्यालयाच्या समस्या  सोडवण्यात फ्लेक्झिबल वर्क स्पेससाच वाटा मोठा असल्याचा इतिहास आहे.

सध्या रोजगाराचा कलही बदलला आहे, प्रकल्पाधारित रोजगार उपलब्ध आहेत, कायमस्वरूपी किंवा दीर्घकालीन रोजगारांची संख्या कमी झाली आहे. यामुळे नवीन कामगारांची भरती आणि जुन्या किंवा प्रकल्प पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनाचा बोजा कंपन्यांवर पडणार नाही, तर फ्लेक्झिबल वर्क स्पेसचे व्यवस्थापन ही जबाबदारी कुशलपणे पार पाडेल. फ्लेक्झिबल वर्क स्पेसमुळे शहरांमधील कोंडी कमी होऊन प्रवासात खर्च होणारा वेळ वाचेल.

सरकारे यात का करू शकतील?

अनेक कंपन्या, व्यावसायिक संस्थांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कोरोना महासाथीच्या काळानंतरही कुठल्याही दूरस्थ ठिकाणाहून काम करण्याची परवानगी देण्याचे योजले आहे, असे जून-२०२० मध्ये तयार करण्यात आलेल्या गार्टनर इंक आणि इतर अहवालांत नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या भाकितांमुळे यासंबंधी काही ठोस धोरण आखण्याची जबाबदार सरकारवर येते. धोरण अंमलात आल्यास सरकारी अधिकारी आणि उद्योगांमधील समन्वय वाढून उद्योगांना कोरोना महासाथीच्या काळात झालेला तोटा भरून काढण्यात मदत होऊ शकेल.

हे सगळे होण्यासाठी सरकारने या क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या उद्योगाबाबत जागरूकता निर्माण होऊन उद्योगाची वृद्धी होण्यास मदत होणार आहे. या सर्वामुळे भविष्यातील कामाच्या स्वरूपाला आकार येईल आणि कामाच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने सुलभता, वेग आणि लवचिता येईल. उद्योगाचा दर्जा मिळताच औद्योगिक संकुलांच्या विकासाचा मार्ग सर्वत्र खुला होईल. आत्ता केवळ मोठ्या शहरातच औद्योगिक संकुलांचा विकास होत आहे.

दुसरे म्हणजे, सरकारने ‘फ्लेक्झिबल वर्क स्पेस’ उद्योगाला मदतीचा हात दिल्यास; अशा प्रकारच्या कार्यालयीन जागांना प्राधान्य देणाऱ्या उद्योगांनाही चालना मिळेल. ‘फ्लेक्झिबल वर्क स्पेस’ची मागणी कोरोना संपल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः स्टार्टअप कंपन्या अशा जागांचा बराच वापर करतात. कोरोना महासाथीमुळे अनेक स्टार्टअप कंपन्यांसमोर अस्तित्व टिकविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. ‘फ्लेक्झिबल वर्क स्पेस’ मध्यम आणि स्टार्टअप उद्योगांना सरकारी मदत अधिक सुकर करण्यास कशी मदत करू शकतात? याचा विचार होणे गरजेचे आहे.

संगणक किंवा मोबाइल अॅप विकसित करणाऱ्या लहान कंपन्यांना प्रोत्साहन देण्याकरिता सरकारने अलीकडच्या काळात अनेक योजना आणि पॅकेजे जाहीर केले आहेत. अधिकाधिक भारतीय बनावटीचे अॅप निर्माण करण्याकरिता आणि तंत्रज्ञान विकासकांना प्रोत्साहित करण्याकरिता निती आयोग आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने अटल इनोव्हेशन मिशन सुरू केले आहे. तसेच उत्तम ऍप विकसित करणाऱ्यांना रोख पुरस्कारही देण्याची योजना आखण्यात आली आहे. अशा प्रकारच्या प्रोत्साहनपर योजनांमधूनच सरकारचा उद्योगाला असलेला पाठिंबा दिसून येतो.

उदयोन्मुख कंपन्यांना ‘फ्लेक्झिबल वर्क स्पेस’चा कार्यालय म्हणून वापर करता येऊ शकेल. तसेच या चैतन्यमयी वातावरणात या कंपन्यांना मार्गदर्शन लाभून त्यांची वाढ झपाट्याने होऊ शकेल. इच्छुक उदयोन्मुख कंपन्यांना मार्गदर्शन, गुंतवणुकीची संधी निर्माण करून देण्यात वुई वर्क लॅब्स आणि ९१ स्प्रिंग बोर्ड इन्क्युबेटर या ‘फ्लेक्झिबल वर्क स्पेस’ संस्था एक उत्तम उदाहरण निर्माण करत स्टार्टअप संस्कृतीला चालना देत आहेत, सरकारच्या प्रोत्साहनपर योजनांना खासगी क्षेत्रातून अशी साथ मिळाल्यास देशातउदयोन्मुख आणि नावीन्यपूर्ण उपक्रम प्रत्यक्षात नक्कीच अवतरतील.

तिसरा महत्वाचा मुद्दा, भारतीय कार्यसंस्कृती गिग अर्थव्यवस्थेत परिवर्तीत होत असल्याने फ्लेक्झिबल वर्क स्पेस उद्योगाला सरकारचा पाठिंबा महत्त्वाचा आहे. २०२५ पर्यंत या कार्यक्षेत्रात सुमारे ७५ टक्के मिलेनियल अर्थात नवयुवा पिढी दिसेल. ही युवा पिढी स्वतंत्रपणे लवचिक कार्यपद्धतीत आपल्या आवडीचे काम करणे अधिक पसंत करतात.फ्लेक्झिबल वर्क स्पेसला मदतीचा हात देऊन सरकार थेट नवतरुणांच्या संपर्कात येईल. ही तरुण पिढीच कोरोना महासाथीनंतरच्या काळात अर्थव्यवस्थेला भरारी घेण्यास मोठ्या प्रमाणात हातभार लावणार आहे.

चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, कर्मचाऱ्यांना परत कार्यालयात रुजू करण्यापूर्वी सुरक्षेचा उपाय म्हणून काही कार्यक्षेत्रांत धोरणात्मक मापदंड आखावे लागतील. कर्मचाऱ्यांचे आरोग्यजपण्यासाठी उद्योगांनादेखील या मापदंडांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. संपूर्ण टाळेबंदीच्या काळात आणि नंतर टप्प्याटप्प्याने होणाऱ्या अनलॉक प्रक्रियेदरम्यान फ्लेक्झिबल वर्क स्पेस क्षेत्रानेआरोग्य सुरक्षा राखण्याकरिता केलेल्या नियमांमुळे एक मापदंड निर्माण केला आहे आणि सरकार याचा अभ्यास करून हेच मापदंड इतर उद्योगांसाठीही अंमलात आणू शकते.

अंतिमतः आपले सामायिक नागरी विकास प्रारूप लक्षात घेता सरकार आणि फ्लेक्झिबल वर्क स्पेस उद्योगातील सहकार्य एक विवेकी पाऊल ठरणार आहे. स्मार्ट सिटी मिशनच्या माध्यमातून शहरांना अधिक स्मार्ट करण्यासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय पायाभूत सुविधांकरिता १११ ट्रिलियन रुपयांची तरतूद केल्याने, शहरांना विकास केंद्र बनवण्याचासरकारचा मानस स्पष्ट होतो. फ्लेक्झिबल वर्क स्पेस क्षेत्रदेखील मोठ्या शहरांत व्यावसायिकांनाउपयुक्त तंत्रज्ञान उपलब्ध होणे, शहरातीलवाहतूकंकोंडी कमी करणे आणि शाश्वत विकास वृद्धिंगत होईल, याच हेतूने काम करत आहेत.

कोरोना महासाथीनंतरचे जीवन

कोरोना महासाथीने उद्योगांना अडथळ्यातून नव्याने विचार करण्यास आणिनावीन्यपूर्ण समाधान काढण्यास भाग पाडले. कोविड १९ ही महासाथ कल्पनेच्याही पलीकडील संकट होते आणि या संकटाने आपल्याला कार्यपद्धतीबाबत काही योग्य प्रश्न उपस्थित केले. आता मात्र आशावाद बाळगत देशाची अर्थव्यवस्था परत प्रगतिपथावर नेण्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जगभर डिजिटल साधनांच्या मुबलकतेमुळे बहुतांश कर्मचाऱ्यांना घरूनही काम करता आले, ही एक उत्तम बाब आहे. दरम्यान, या शोधनिबंधात आगोदरच म्हटल्याप्रमाणे वर्क फ्रॉम होम ही काही चिरकाल टिकणारी कार्यपद्धती नाही आणि उद्योगांचा कलदेखील “वर्क फ्रॉम एनीव्हेअर” या संस्कृतीकडे आहे. सरकार, उद्योग आणि कर्मचारी रिमोट वर्किंग या मुद्यावर एकत्र येतील, अशी आशा आहे.

कोविड १९ दरम्यान उदयास आलेली रिमोट कार्यपद्धती भविष्यात फ्लेक्झिबल वर्क स्पेस क्षेत्राच्या वाढीस चालना देईल. विशेषतः अनेक कर्मचाऱ्यांची भविष्यात अशाच पद्धतीने काम करण्याची मानसिकता बनली आहे. फ्लेक्झिबल वर्क स्पेस उद्योग आणि सरकार एकत्र आल्यानेया क्षेत्राच्या वृद्धीस गती मिळेल आणि त्याचबरोबर या नव्या कल्पनेतून अर्थव्यवस्थेला हातभार लागण्यास मदत होऊ शकेल.

मागे वळून पहाताना २४ मार्च २०२० रोजी भारतीय जनजीवन ठप्प झाले, असेच म्हटले जाईल. मात्र या इतिहासाने समस्येत संधी दडलेली असते हे शिकवले हे विसरून चालणार नाही. भूतकाळात डोकावले तर लक्षात येईल की, सार्सच्या साथीनंतर अनेक चिनी ग्राहकांना अलिबाबाने प्रस्थापित केलेली कार्यसंस्कृती योग्य असल्याची खात्री झाली. तर वाय २ के हा संणकीय विषाणू भारतीयमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी वरदान ठरला आणि त्यामुळे बीपीओ क्षेत्राला गती मिळाली. या सर्व पार्श्वभूमीवर रिमोट वर्किंगसाठी २०२० मध्ये अवतरलेली कोरोना महासाथ वरदान ठरले, तर आश्चर्य वाटायला नको.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Arnav Singh Gusain

Arnav Singh Gusain

Arnav Singh Gusain is Country Head Real Estate and Product for WeWork in India. Arnav has over two decades of experience in the real estate ...

Read More +