Published on Aug 02, 2023 Commentaries 0 Hours ago

भारतात शाश्वत शीत वैद्यकीय पुरवठा साखळी स्वीकारण्यासाठी एक विवेकी पर्याय अस्तित्वात आहे, जो आरोग्य सेवा व्यवस्थेवर हवामान बदलाच्या होणाऱ्या परिणामांचा यशस्वीपणे सामना करू शकतो.

शीत कार्बनचे मूल्यमापन: भारतातील शाश्वत शीत वैद्यकीय पुरवठा साखळीकडे वळण्याकरता खर्च- लाभाची चौकट

जागतिक स्तरावर आरोग्य सेवा क्षेत्राद्वारे हवेत मोठ्या प्रमाणावर विषारी, हानीकारक वायू उत्सर्जित केले जातात. वर्षाकाठी जागतिक स्तरावर होणाऱ्या कार्बन उत्सर्जनातील अंदाजे ५.२ टक्के उत्सर्जन आरोग्य क्षेत्राद्वारे होते. दर वर्षी यांत ५ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. आरोग्य सेवा क्षेत्राद्वारे हवेत सोडल्या जाणाऱ्या विषारी वायूंमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण वाटा वैद्यकीय पुरवठा साखळीद्वारे होणाऱ्या उत्सर्जनाचा आहे. भारतात, आरोग्य सेवा क्षेत्रातील एकूण उत्सर्जन जागतिक सरासरीपेक्षा २ टक्के कमी असताना, आरोग्य सेवा क्षेत्रातील पुरवठा साखळीद्वारे होणाऱ्या उत्सर्जनाचा वाटा एकूण उत्सर्जनाच्या ८१ टक्के आहे.

आरोग्य सेवा क्षेत्राद्वारे हवेत सोडल्या जाणाऱ्या विषारी वायूंमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण वाटा वैद्यकीय पुरवठा साखळीद्वारे होणाऱ्या उत्सर्जनाचा आहे.

जागतिक स्तरावर संबंधित भागीदारांमध्ये सहकार्य आणि पर्यावरणपूरक पद्धती अनुसरण्यासंबंधीच्या विषयाचे वाढते महत्त्व, पर्यावरणीय शाश्वततेला चालना देण्यामागील एक प्रमुख प्रेरक शक्ती आहे. मात्र, कमी विकसित देशांकरता हे तितकेसे खरे नसेल. उदाहरणार्थ, भारतामध्ये वापरल्या जाणार्‍या पारंपरिक जीवाश्म इंधनावर आधारित शीत साखळीमध्ये अनेकदा तडजोड केलेल्या कार्यक्षमतेचा सामना करावा लागतो. यामुळे महत्त्वपूर्ण हवामान बदलास आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाला हातभार लागतो. जागतिक कल आणि भारताच्या पर्यावरणासंबंधीच्या वचनबद्धतेचे अनुसरण करीत, हरित आरोग्य सेवा वितरण व्यवस्थेकडे वळणे अत्यावश्यक आहे. संक्रमणाची ही प्रक्रिया निश्चितपणे खर्चिक असली तरी, या संक्रमणाशी संबंधित अल्प-मुदतीचा व दीर्घ मुदतीचा खर्च आणि त्यामुळे होणाऱ्या फायद्यांचा लेखाजोखा- निर्णय घेण्यासाठी व धोरणात्मक हेतूंसाठी आणि पुरवठा साखळीमध्ये पुरेसे स्वारस्य निर्माण करण्यासाठीही महत्त्वाचा आहे. या लेखात भारतातील शीत वैद्यकीय पुरवठा साखळ्यांचे स्वरूप, विस्तार आणि प्रासंगिकता, त्यांचा हवामानावर होणारा परिणाम, अक्षय-आधारित पर्यायांकडे करावे लागणारे संभाव्य संक्रमण आणि वातावरणात अतिरिक्त कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जित केल्याने होणार्‍या आर्थिक नुकसानाचा अंदाज अशा संबंधित घटकांचा शोध घेण्यात आला आहे.

व्यवसायात नेहमी होणारा सामाजिक खर्च

अभ्यास असे दर्शवतात की, वैद्यकीय शीत साखळींवर जीवाश्म इंधन-आधारित ऊर्जा सेवांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहण्याचे अनेक प्रतिकूल परिणाम झाले आहेत, ज्यात इंधन पुरवठ्याची उपलब्धता आणि स्थिर शीतकरण साठवणूक युनिट्समधील ऊर्जा स्थगिती यांचा समावेश आहे, ज्याचा थेट परिणाम आरोग्य सेवा पुरविणाऱ्यांच्या महत्त्वाच्या सेवा प्रदान करण्याच्या क्षमतेवर होतो आणि संभाव्यत: जीव वाचविण्याच्या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो. मोठ्या प्रमाणातील जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व, विषारी वायू उत्सर्जनाला आणि हवेच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरते आणि जागतिक तापमानवाढीलाही हातभार लागतो. भारतीय औषधनिर्माण क्षेत्र हे आरोग्य क्षेत्रातील सातव्या क्रमांकाचे सर्वात मोठे विषारी वायू हवेत सोडणारे क्षेत्र आहे. (अर्थव्यवस्थेच्या आकाराशी संबंधित) उद्योगाची अंदाजित वाढ, २०३० सालापर्यंत १३.४ टक्के या चक्रवाढ वार्षिक वाढ दराने होणे अपेक्षित आहे. अधिक ऊर्जेचे कार्यक्षम आणि हरित अथवा स्वच्छ पर्यायांकडे संक्रमण सुरू झाले नाही तर उद्योगाच्या या वाढीसोबत- विजेची मागणी व हवेत सोडल्या जाणाऱ्या विषारी वायूंमध्येही समान वाढ होईल.

मोठ्या प्रमाणातील जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व, विषारी वायू उत्सर्जनाला व हवेच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरते आणि जागतिक तापमानवाढीलाही हातभार लागतो.

जागतिक तापमानवाढीचा आणखी एक शक्तिशाली स्रोत म्हणजे- विशेषत: शीत पुरवठा साखळ्यांमधून निघणाऱ्या- क्लोरोफ्लुरोकार्बन्स, हायड्रोक्लोरोफ्लुरोकार्बन्स आणि हायड्रोफ्लुरोकार्बन यांसारख्या शीतकरणाकरता वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमधून विषारी वायूंचे उत्सर्जन होत राहते, ज्यामध्ये लक्षणीयरीत्या उच्च ओझोन कमी होण्याची क्षमता आणि जागतिक तापमानवाढीची संभाव्यता आहे. हे परिणाम हवामान बदल आणि आरोग्याच्या छेदनबिंदूवर पर्यावरणीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून येणाऱ्या आर्थिक खर्चावर पुढे येतात.

संक्रमण का करायला हवे?

शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी आणि शीत वैद्यकीय पुरवठा साखळींचा हवामानावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी अक्षय-आधारित पर्यायांकडे वळणे आवश्यक आहे. सौर आणि पवन ऊर्जा यांसारखे अक्षय ऊर्जा स्त्रोत शीतगृह सुविधांसाठी आणि वाहतुकीसाठी शाश्वत उपाय देतात. स्वच्छ ऊर्जा निर्माण करण्यासाठी साठवणुकीच्या ज्या सुविधा आहेत, त्यांच्या छतावर सौर पॅनेलची मांडणी केली जाऊ शकते, तर शीतकरणांच्या वाहनांच्या वीज पुरवठ्यात पवन ऊर्जेवर चालणारी टर्बाइन्स बसवता येऊ शकतील. यामुळे विषारी वायूंचे उत्सर्जन कमी होईल, त्याचबरोबर आरोग्य सेवा क्षेत्रातील ऊर्जा कार्यक्षमता वाढेल आणि हवामान बदलाच्या परिणामांचा यशस्वीपणे सामना करता येईल. संपूर्ण भारतातील यशस्वी प्रकरणांतून आणि प्रायोगिक प्रकल्पांतून अक्षय-आधारित शीत साखळीची व्यवहार्यता आणि लाभ दिसून आले आहेत. उदाहरणार्थ, भारतातील अनेक राज्यांनी दुर्गम भागात लशींचे आणि औषधांचे संरक्षण सुनिश्चित करून ‘सोलार डायरेक्ट ड्राइव्ह वॅक्सिन रेफ्रिजरेटर्स’सारख्या सौर उर्जेवर चालणाऱ्या शीतगृह सुविधा कार्यान्वित केल्या आहेत. या व्यतिरिक्त, ‘बी मेडिकल सिस्टीम्स’सारख्या जागतिक कंपन्यांनी सौर उर्जेवर चालणाऱ्या शीतगृह साखळ्या उपाययोजनांकरता पुढाकार घेतला आहे आणि ‘सेल्को फाऊंडेशन’सारख्या संस्थांनी कमी सेवा उपलब्ध असलेल्या प्रदेशांत अशा आरोग्य सेवा उपलब्ध होण्याकरता नाविन्यपूर्णतेद्वारे नव्या उपाययोजना उपलब्ध केल्या आहेत. हे उपक्रम भारतातील शीत वैद्यकीय पुरवठा साखळीच्या चित्रात बदल घडवून आणण्याकरता अक्षय क्षमतेची संभाव्यता दर्शवतात.

मुख्य पैलूंमध्ये पायाभूत गुंतवणुकीचा खर्च, कार्यरत राहण्याचा खर्च, कौशल्याची आवश्यकता, वैद्यक कचरा कमी करणे, आरोग्य सेवा वितरण सुधारणा, संभाव्य ऊर्जा बचत, विषारी वायूंचे उत्सर्जन कमी करणे व हवामान बदल कमी करणे याकरता आवश्यक प्रारंभिक भांडवली गुंतवणुकीचा समावेश होतो.

पारंपरिक जीवाश्म इंधन-आधारित शीत साखळीकडून अक्षय-आधारित पर्यायांकडे वळण्यासाठी होणारा सर्वसमावेशक खर्च आणि त्यातून मिळणारे लाभ यांच्या विश्लेषणासाठी विविध घटकांचा काळजीपूर्वक विचार होणे आवश्यक आहे. मुख्य पैलूंमध्ये पायाभूत गुंतवणुकीचा खर्च, कार्यरत राहण्याचा खर्च, कौशल्याची आवश्यकता, वैद्यक कचरा कमी करणे, आरोग्य सेवा वितरण सुधारणा, संभाव्य ऊर्जा बचत, विषारी वायूंचे उत्सर्जन कमी करणे आणि हवामान बदल कमी करणे याकरता आवश्यक प्रारंभिक भांडवली गुंतवणुकीचा समावेश होतो. जरी आगाऊ खर्च त्रासदायक वाटला, तरी दीर्घकालीन फायदे त्यापेक्षा अधिक आहेत.

अक्षय-आधारित शीत साखळींच्या आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक फायद्यांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. विषारी वायूंच्या उत्सर्जनात घट झाल्यामुळे हवा शुद्ध होते आणि सार्वजनिक आरोग्यविषयक परिणाम सुधारतात. शिवाय, अक्षय ऊर्जेशी एकीकरण साधल्याने कालांतराने ऊर्जाविषयक कार्यक्षमता वाढते, जेव्हा उत्पादन कार्यक्षम होते तेव्हा कंपन्यांना फायदा होतो आणि कार्यान्विततेचा खर्च दीर्घ कालावधीत कमी होतो. यामुळे दुर्गम भागांत विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध होण्याचे प्रमाणही सुधारते, ज्यामुळे आरोग्य परिणामांत सुधारणा होते आणि आरोग्य सेवेवरील भार कमी होतो. या व्यतिरिक्त, या संक्रमणामुळे अक्षय ऊर्जा क्षेत्रात रोजगार निर्मितीला चालना मिळते, शाश्वत आर्थिक विकासाला चालना मिळते. हवेतील विषारी वायूंच्या उत्सर्जनातील घट जागतिक तापमानवाढ मर्यादित करते आणि हवामान बदलाचे दीर्घकालीन पर्यावरणीय आणि सामाजिक प्रभाव कमी करते.

खर्च आणि मिळणारे लाभ यांच्या विश्लेषणाची चौकट: कार्बन उत्सर्जनाच्या समाजाला मोजाव्या लागणाऱ्या किमतीचे एकत्रिकरण

या संक्रमण प्रक्रियेतील निव्वळ फायदे आणि विरोधी स्थितीत समतोल साधण्याची कृती समजून घेण्यासाठी आम्ही एक व्यापक खर्च-लाभ विश्लेषण चौकट प्रस्तावित करतो. आम्ही जीवाश्म-इंधनावर आधारित शीतगृहे आणि पुरवठा-साखळ्यांमधून अक्षय्यतेवर आधारित असलेल्या शीतगृहांकडे वळतो तेव्हा उत्सर्जन कमी करणे आणि कार्बन चौकटीचा सामाजिक दृष्टिकोनातून खर्च एकत्रित करणे हे या चौकटीत समाविष्ट आहे. कार्बन डायऑक्साइडच्या अतिरिक्त मेट्रिक टन उत्सर्जनामुळे जे नुकसान होते, त्याच्या आर्थिक खर्चाचे प्रतिनिधित्व आपल्याला कार्बनच्या सामाजिक खर्चावरील युक्तिवादाकडे आणते. जागतिक स्तरावर, भारतामध्ये कार्बनची देशपातळीवरील सामाजिक किंमत सर्वाधिक आहे. हा खर्च सुमारे ९० अमेरिकी डॉलर्स प्रति टन कार्बन डायऑक्साइड आहे, ज्याचा आर्थिकदृष्ट्या खर्च वर्षाकाठी २४३ अब्ज अमेरिकी डॉलर्स आहे. शीतकरणाकरता वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये नैसर्गिक पदार्थांना प्राधान्य देऊन, भारताने २०३० सालापर्यंत ५० दशलक्ष टन कार्बन डायऑक्साइडच्या समतुल्य विषारी वायूंच्या उत्सर्जनात घट साध्य करण्याचा अंदाज व्यक्त केला आहे, ज्यामुळे वार्षिक खर्चात ४.५ अब्ज अमेरिकी डॉलर्सची बचत होईल, तसेच २०३० पर्यंत कार्बन डायऑक्साइडच्या समतुल्य असणाऱ्या विषारी वायूंच्या उत्सर्जनात १४ टक्के कपात होईल आणि हे लहान व्यावसायिक वाहन विभागात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढल्याने शक्य होईल, ज्यामुळे दीर्घकालीन आर्थिक लाभांमध्ये भर पडेल.

भांडवली खर्चाच्या, कार्यान्वित असण्याच्या आणि देखभाल खर्चाच्या माध्यमातून खर्चाचा अंदाज लावला जाईल, आणि त्यानंतर कार्बन उत्सर्जनाच्या अंदाजाद्वारे कार्बनचा एकूण सामाजिक खर्च लक्षात घेतला जाईल.

आम्ही येथे प्रस्तावित केलेल्या गणितीय चौकटीत दोन परिस्थितींचा विचार केला आहे, म्हणजे, नेहमीसारखा व्यवसाय (अथवा सद्य परिस्थितीचे सातत्य) आणि संक्रमण (जेव्हा ऊर्जा संक्रमण जीवाश्म इंधनापासून अक्षय ऊर्जेकडे होते) परिस्थिती. भांडवली खर्चाच्या, कार्यान्वित असण्याच्या आणि देखभाल खर्चाच्या माध्यमातून खर्चाचा अंदाज लावला जाईल, आणि त्यानंतर कार्बन उत्सर्जनाच्या अंदाजाद्वारे कार्बनचा एकूण सामाजिक खर्च लक्षात घेतला जाईल. अधिशुल्काच्या मान्य दरासह ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या नियोजनासह ‘निव्वळ वर्तमान मूल्या’चा (एनपीव्ही) अंदाज घेऊन कार्बनच्या सामाजिक खर्चात बचतीचा अंदाज लावणे आवश्यक आहे. रोजगार निर्मिती, खर्च बचत, ऊर्जा बचत, मूल्य शृंखलेतील कार्यक्षमतेत वाढ, महसूल निर्मिती, वैद्यक कचरा कमी करणे व विल्हेवाट खर्च कमी करणे, आणि मागील विभागात स्पष्ट केलेल्या सर्व बाबींचाही विचार करणे आवश्यक आहे आणि ‘निव्वळ वर्तमान मूल्या’च्या स्वरूपात पूर्व-निर्धारित नियोजन आणि अधिशुल्क (सवलत) दर सादर करणे आवश्यक आहे. प्रत्येक परिस्थितीतील मूल्य आणि कमी कार्बन उत्सर्जनामुळे संक्रमण परिस्थितीत होणारी बचत, याद्वारे समाजावर कार्बनचा कमी खर्च लादला जातो, यामुळे शाश्वत शीत वैद्यकीय साखळी मध्यम आणि दीर्घ काळाकरता अधिक चांगला पर्याय का ठरते याचे अधिक चांगले समर्थन होईल.

निष्कर्ष काढताना…

अक्षय-आधारित शीत साखळीकडे वळण्याच्या प्रयत्नांना आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक घटकांचा विचार करणार्‍या सर्वसमावेशक खर्च आणि मिळणारा लाभ या विश्लेषणाचे समर्थन असणे आवश्यक आहे. या लेखात आम्ही सुचविल्याप्रमाणे निश्चितच अधिक चांगल्या मूल्यांकन यंत्रणेची आवश्यकता आहे. मूल्यांकन यंत्रणा एक वस्तुनिष्ठ साधन प्रदान करते, ज्याद्वारे निर्णय आणि धोरण-निर्धारण स्तरावर ऊर्जा संक्रमण तर्कसंगत केले जाऊ शकते. शिवाय, कार्बनच्या सामाजिक खर्चाचा युक्तिवाद केल्याने ही संक्रमण यंत्रणा एका संकुचित, दूरदृष्टीच्या अभावापेक्षा परताव्याच्या व्यापक सामाजिक दराच्या दृष्टिकोनातून तर्कसंगत बनते.

प्रत्येक परिस्थितीतील मूल्य आणि कमी कार्बन उत्सर्जनामुळे संक्रमण परिस्थितीत होणारी बचत, याद्वारे समाजावर कार्बनचा कमी खर्च लादला जातो, यामुळे शाश्वत शीत वैद्यकीय साखळी मध्यम आणि दीर्घ काळाकरता अधिक चांगला पर्याय का ठरते याचे अधिक चांगले समर्थन होईल. 

सरकार, खासगी क्षेत्र आणि आंतरराष्ट्रीय संस्थांसह भागधारकांनी अक्षय ऊर्जा पायाभूत सुविधा, धोरण समर्थन व तांत्रिक नवकल्पना यांमध्ये सहयोग करणे व गुंतवणूक करणे आवश्यक आहे. यासाठी शाश्वत विकास उद्दिष्ट कर्जे आणि शाश्वत विकास रोखे यांसारखी नाविन्यपूर्ण आर्थिक साधने व करात सरकारने दिलेल्या सवलती यांसारख्या योजनांना वित्तपुरवठा करण्यासाठी अनुदानासारख्या नाविन्यपूर्ण आर्थिक साधनांचीही आवश्यकता आहे, ज्यात परताव्याचे उच्च सामाजिक दर असू शकतात, परंतु नेहमीच उच्च खासगी आर्थिक परतावा मिळू शकत नाही. कोणत्याही परिस्थितीत, भारताकरता शाश्वत शीत वैद्यकीय पुरवठा साखळी आत्मसात करण्यासाठी एक स्पष्ट युक्तिवाद करता येईल, जो हवामान-बदल रोखणारी आरोग्य सेवा व्यवस्था निर्माण करण्यासाठी हातभार लावू शकतो, ज्याची मानवी आणि पर्यावरणीय आरोग्याला एकाच वेळी मदत होईल.

निलांजन घोष हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या ‘सेंटर फॉर न्यू इकॉनॉमिक डिप्लोमसी’चे संचालक आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Authors

Nilanjan Ghosh

Nilanjan Ghosh

Dr. Nilanjan Ghosh is a Director at the Observer Research Foundation (ORF), India. In that capacity, he heads two centres at the Foundation, namely, the ...

Read More +
Debosmita Sarkar

Debosmita Sarkar

Debosmita Sarkar is a Junior Fellow with the SDGs and Inclusive Growth programme at the Centre for New Economic Diplomacy at Observer Research Foundation, India. ...

Read More +