Author : Rasheed Kidwai

Published on Feb 19, 2019 Commentaries 0 Hours ago

देशाच्या राष्ट्रीय राजकारणातले आपले डळमळीत झालेले स्थान, पुन्हा एकदा बळकट करण्यासाठी प्रियंका गांधीचा करिष्मा पुरेसा ठरेल का?

प्रियंकाप्रवेशाने काँग्रेसला गतवैभव मिळेल?

देशाच्या राष्ट्रीय राजकारणातले आपले डळमळीत झालेले स्थान, पुन्हा एकदा बळकट करण्यासाठी काँग्रेस पक्ष सध्या प्रचंड सघर्ष करतो आहे. या धडपडणाऱ्या पक्षाला त्यांच्या नव्या महासचिव म्हणजेच प्रियंका गांधी पुन्हा एकदा “गतवैभव” परत मिळवून देऊ शकतात का?.. हा प्रश्न सध्या देशाच्या राजकारणात महत्वाचा ठरला आहे.

अर्थात याबाबत राजकीय जाणकारांमध्ये मत मतांतर आहेत. प्रियंका गांधी-वाड्रा याचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासारखे दिसणे, जनतेशी जवळीक साधणारा त्यांचा करिश्मा, आणि विरोधकांवर शाब्दिक हल्ला करता येण्याएवढी उपलब्ध माहिती… यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीसमोर (रालोआ) मोठे आव्हान निर्माण करण्यात निश्चित यश येईल असे काँग्रेसच्या नेत्यांना आणि देशातल्या या जुन्या पक्षाशी सहानुभूती बाळगणाऱ्यांना वाटते. तर, त्याचवेळी प्रियंका यांचा राजकारण प्रवेश ही फारच शुल्लक आणि राजकीयदृष्ट्या मुहुर्त चूकलेली घटना आहे असे विरोधक आणि प्रियंका यांच्याबाबत साशंक असणाऱ्यांना वाटते.

राजकारणात जात-उपजात महत्वाची ठरते, त्याशिवाय राजकीयदृष्ट्या व्यवस्थापन कौशल्य, आणि राजकीय चातुर्य हे गुणही त्या व्यक्तीमधे असावे लागतात. मात्र ते सोडून केवळ इंदिराजींसोबत असलेलं साधर्म्य आणि अंगीभूत हजरजबाबीपणाच्या जोरावर प्रियंका गांधी यांना राजकीय यश मिळणार नाही असेही त्यांच्या विरोधकांचे ठाम मत आहे. प्रियंका गांधी यांनी आजपर्यंत पक्षामध्ये, सार्वजनिक आस्थापनांमध्ये किंवा अगदी स्वतःच्या व्यावसायिक कारकिर्दीत कोणत्याही महत्वाच्या पदाची जबाबदारी सांभाळलेली नाही, त्यामुळे कोणताही नवमतदार प्रियंका गांधी यांच्या मागे वाहवत जाणार नाही असेही अनेकांचे मत आहे.

प्रियंका यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्यावर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप ही प्रियंका गांधींसमोर असलेल्या समस्यांपैकी एक मोठी समस्या आहे. अर्थात हे सर्व आरोप “राजकीयदृष्ट्या प्रेरीत” आहेत, असा रुळलेला राजकीय बचाव त्या नक्कीच करू शकतील. असे असले तरी कलंकीत राजकीय व्यक्तिंबाबतच्या मध्यमवर्गीयांच्या भावना लक्षात घेतल्या तर, सुशिक्षित तसंच युवा आणि स्त्री वर्गाचा विश्वास जिंकण्याचे प्रियंका यांच्यासमोरचे आव्हान, निश्चितच सोपे नाही.

या ही पलिकडे जाऊन पाहिले तर प्रियंका यांच्यासमोर असलेली असंख्य आव्हाने आणि अडचणी, त्यांच्याकडून असलेल्या खूप साऱ्या अपेक्षा.. ही परिस्थितीच खरे तर एक मोठी समस्या आहे. एकीकडे त्यांना त्यांच्याच पतीच्या विरोधातल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना तोंड द्यायचेय, तर दुसरीकडे सदैव नव्या नव्या राजकीय मोहीमांसाठी युद्धपातळीवर सज्ज असणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महासचिवाची भूमिकाही पार पाडायची आहे. राजकीयदृष्ट्या सर्वसज्ज असलेल्या भाजपाला भाजपाला तोंड देण्यासाठी प्रियंका यांना समाजमाध्यमांना समर्थपणे हाताळावं लागेल… ट्विटरवर कार्यरत राहावे लागेल, शिवाय दररोज २४ तास सुरु असलेल्या बातम्यांच्या दूरचित्रवाणी वाहिन्यांचा खूबीनं वापरही करून घ्यावा लागेल. इथे हे ही समजून घ्यावं लागेल की उत्तर प्रदेश वगळता महाराष्ट्र, तमिळनाडु, बंगाल, गुजरात, पंजाब आणि देशातल्या उरलेल्या इतर राज्यांमध्ये प्रियंका गांधी यांनी पक्षाच्या स्टार प्रचारक म्हणून काम करावे अशी कोणत्याही काँग्रेस नेत्याची इच्छा नाही.

प्रियंका गांधी यांच्यावरच्या जबाबदारीचा पसारा आपल्याला दिसतोय त्या ही पलिकडचा आहे. तो जाणून घेण्यासाठी प्रियंका यांच्यावरच्या जबाबदाऱ्यांचे स्वरुप आपल्याला समजून घ्यावे लागेल. प्रियंका यांच्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्यांचे भाऊ राहुल गांधी हे झाकोळून जाणार नाहीत याची खबरदारी घेतच प्रियंका यांना वाटचाल करायची आहे. यामुळेच पक्षातल्या राजकीय मुत्सद्दी, राजकीय तज्ज्ञ आणि पक्ष नेत्यांना प्रियंका यांच्याशी सल्लामसलत करताना प्रचंड मर्यादा येणार आहेत. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यातलं भाऊ-बहिणीचं नातं राजकीयदृष्ट्या इतके संवेदनशील होऊन जाते, की त्यामुळे कदाचित आई सोनिया गांधी यांचा अपवाद सोडला तर इतर कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला त्या दोघांमध्ये हस्तक्षेप करणे किंवा सल्लामसलत करणे कठीण जाणार आहे.

प्रियंका गांधी यांच्या आयुष्यावर दृष्टीक्षेप टाकला तर, त्यांचा सक्रीय राजकारणातला प्रवेश हा अनेकांना भविष्याची नांदी का वाटत असवी, किंवा किमान काँग्रेस पक्षाचे नेते, सामान्य कार्यकर्ते, समर्थक आणि हितचिंकांना त्यांचा राजकारण प्रवेश काँग्रेसला नवचैतन्य देईल असे का वाटत असावे हे लक्षात येते. भाजपाने १९९९ च्या निवडणुकीत प्रियंका यांचे काका काका अरुण नेहरू यांना नेहरु गांधी कुटुंबाचे निष्ठावतं सेवक कॅप्टन सतिश शर्मा यांच्या विरोधात उभे केले होते. त्यावेळी प्रियंका यांनी आपले काका अरुण नेहरू यांना एकट्याच्या बळावरच नेस्तनाबूत केले होते. निवडणूकीच्या प्रचारसभेत जनसमुदायाला त्यांनी हिंदी भाषेत संबोधित करताना घणाघाती हल्लाच चढवला होता… “मुझे आप से एक शिकायत है। मेरे पिता के मंत्रीमंडल मे रहते हूए जिसने गद्दारी की, भाई की पीठ में छूरा मारा, जवाब दिजीए, ऐसे आदमी को आपने यहाँ घुसने कैसे दिया..? उनकी यहाँ आने की हिम्मत कैसे हुई?” (“माझी तुमच्याकडे एक तक्रार आहे. माझ्या वडिलांच्या मंत्रिमंडळात काम करुनही, ज्या व्यक्तीनं विश्वासघात केला, , स्वतःच्याच भावाच्या पाठीत सुरा खुपसला, अशा व्यक्तीला तुम्ही इथे येऊच कसं दिलंत? अशा विश्वासघातकी इसमाची इथे येण्याची हिम्मतच कशी झाली? याचं उत्तर मला तुमच्याकडून हवं आहे”) असा थेट सवालच त्यांनी मतदारांना केला होता. उपस्थित जनसमुदाय प्रियांका गांधी यांचं म्हणणं स्तब्धपणे ऐकत होता. आपल्या प्रश्नानंतर प्रियंका पुन्हा म्हणाल्या, यहाँ आनेसे पेहेले मेने अपनी माँ से बात की थी। माँ ने कहा किसी की बुराई मत करता। मगर मैं जवान हूँ, दिल की बात आपसे ना कहूँ तो किसे कहूँ? (इथे येण्याआधी मी माझ्या आईसोबतही बोलले होते. कोणाबद्दलही काही वाईटसाईट बोलू नकोस असा सल्ला मला आईने दिला. पण मी तरुण आहे, माझ्या मनातल्या भावना मी तुमच्याकडे नाहीतर कोणाकडे मांडणार?) प्रियंका गांधी यांचा हा शाब्दिक – भावनिक प्रहार इतका तीव्र होता की, तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या प्रभावी वक्त्यालाही त्याची परिणामकारता मोडून काढता आली नाही.

प्रियंका गांधी यांच्या सभेनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी वाजपेयी यांनी रायबरेलीला भेट दिली होती. आपल्या नेहमीच्याच शैलीत, त्यांनी प्रियंका गांधी यांच्यावर टीका केली होती. रायबरेलीवर आता, आता कुणातरी दुसऱ्याचेच वर्चस्व आहे हे प्रियंका गांधी यांना ठाऊक आहे, म्हणून त्या इथे यायला घाबरल्या आहेत अशा शब्दांमध्ये वाजपेयी यांनी प्रियंका यांच्यावर हल्ला चढवला होता. पण प्रियंकांचा प्रभाव कमी करण्याचे प्रयत्न करण्यात वाजपेयींना खूपच उशीर झाला होता. तिथल्या जनतेने अरुण नेहरु यांच्या भविष्यावर आधीच मोहोर उमटवली होती, आणि अखेर त्यांचा पराभव झालाच. नेहरु गांधी कुटुंबातली एक सदस्य असलेल्या प्रियंका गांधी अशा प्रभावी रितीने संवाद साधू शकतात ही गोष्टच त्यावेळच्या कॉंग्रेस समर्थक आणि हितचिंतकांसाठी खूप महत्वाची होती.

सोनिया गांधी यांनी २००४ आणि २००९ साली झालेल्या दोन लागोपाठच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला यश मिळवून दिले. आता प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर काँग्रेसला त्यांचं “गतवैभव” पुन्हा मिळवून देण्याची मोठी जबाबदारी आहे.

याच संदर्भाने तामिळनाडूतली घटनाही महत्वाची आहे. तिथे प्रियंका यांनी जनसमुदायाला तामिळ भाषेतून आवाहन केलं होतं, “एल्लोरम् काँग्रेस्सिक्कू व्होट् पोडुंगल् (तुम्ही सगळ्यांनी काँग्रेसला मत द्यावं).” प्रियंका गांधी केवळ इतकंच बोलल्या होत्या, पण त्यांच्या या एका आवाहनानंच जनसमुदायावर मोठा प्रभाव टाकला. खरं तर श्रीपेरंबुदूर इथली सभा सोनिया गांधी यांच्या राजकीय पदार्पणाची नांदी ठरायची होती. पण ११ जानेवारी १९८८ ला झालेल्या सभेनं प्रियंका गांधी यांच्या प्रभावासमोर त्यांचीच आई सोनिया गांधी यादेखील झाकोळून गेल्या.  प्रियंका गांधी यांनी नेसलेली लाल आणि नारंगी साडी, त्यांच्या आईच्या हिरव्या तपकिरी रंगाच्या साडीपेक्षा उठून दिसत होती. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रियंका यांच्या स्मित हास्याचा प्रभाव जावण्याइतपत ठळक होता.

काहिशा चिंतेत आणि संकोचलेल्या वाटणाऱ्या सोनिया गांधी यांच्यापेक्षाही प्रियंका गांधी अगदी सहज, आत्मविश्वासाने आणि तितक्याच प्रभावीपणे उपस्थित जनतेला सामोरे जातायत हे त्या व्यासपीठावर ठळक दिसणारं चित्र होते. जनतेला आकर्षिक करु शकतील, त्यांच्यावर प्रभाव टाकू शकतील अशी दोन प्रभावी व्यक्तीमत्व आता काँग्रेस पक्षाकडे होती. त्यामुळे स्वाभाविकपणे काँग्रेस पक्षाच्या देशभरातल्या वर्तुळात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झालं होते. प्रियंका गांधी यांचा प्रभाव दूरवर पसरत असल्याचं स्पष्ट दिसत असले, तरी दूरदृष्टी असलेल्या काँग्रेस नेत्यांनी प्रियंका गांधी यांनाच पुढे आणण्याची घाई न करण्याचा दृष्टेपणा दाखवला असं आता नक्कीच म्हणता येईल.

काँग्रेसमधल्या द्रष्ट्या नेत्यांनी काँग्रस पक्षासमोर “पुढची पन्नास वर्षे नेतृत्वाचा प्रश्न नाही” असंच घोषित करून टाकले. “आतापासून किमान २० वर्षे सोनिया गांधी नेतृत्वाची धूरा सांभाळतील आणि त्यानंतर प्रियंका गांधी”, असं त्यांनी जाहीर केले. आज २० वर्षांनंतर हे शब्द ईश्वरी वचनाप्रमाणे खरे ठरत आहेत असे चित्र दिसतेय. सोनिया गांधी यांनी २००४ आणि २००९ साली झालेल्या दोन लागोपाठच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला यश मिळवून दिले. आता प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर काँग्रेसला त्यांचे “गतवैभव” पुन्हा मिळवून देण्याची मोठी जबाबदारी आहे.

प्रियंका गांधी यांच्यातल्या क्षमतेची चूणूक दाखवणाऱ्या या घटना २० वर्षांपूर्वीच्या म्हणजेच १९९८-१९९९ या काळातल्या आहेत. ही बाब लक्षात घेतली तर आताच्या परिस्थितीत एक महत्वाचा प्रश्न उभा ठाकतो की, उत्तर प्रदेशातल्या अमेठी आणि रायबरेली बाहेर प्रियंका आपला करिश्मा दाखवू शकतात किंवा नाही? याच प्रश्नाच्या अनुषंगाने पाहिले तर उत्तर प्रदेशाच्या २०१२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रियंका यांनी अमेठी आणि रायबरेली विधानसभाक्षेत्रात आपलं लक्ष केंद्रीत केले होते. मात्र तिथे त्या स्वतःचा प्रभाव दाखवू शकल्या नाहीत.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजवरच्या ७२ वर्षांच्या कार्यकाळात गांधी कुटुंबाने सुमारे ५९ वर्ष काँग्रेसचे नेतृत्व केले आहे. जवळपास कोणताही काँग्रेस कार्यकर्ता हा गांधी कुटुंबालाच पक्षाचं पक्षाच्या निर्विवाद नेतृत्वस्थानी बघतो हे वास्तव आहे. या बदल्यात त्यांची अपेक्षा असते की, नेतृत्व करणाऱ्या गांधी कुटुंबाने पक्षाला निवडणुकीत यश मिळवून द्यावे, सत्ता मिळवून द्यावी. जवाहरलाल नेहरू यांच्यापासून इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या कारकिर्दीकडे पाहिले तर गांधी कुटुंबातला आजवरचा कोणताही सदस्य राजकीयदृष्ट्या अयशस्वी ठरला नाही, किंवा त्यांनी राजकारणातून अंगही झटकले नाही. त्यामुळेच काँग्रेस नेत्यांनी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व म्हणून गांधी कुटुंबियांच्या पलिकडे कधी पाहिलेही नाही आणि त्या नेतृत्वाचे नेहमीच डोळे झाकून अनुसरणही केलं आहे. पक्षातल्या या धारणांचे ओझे आता राहुल आणि आता प्रियंका यांना वाहायचे आहे. काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्या आणि नेत्यानं ज्या राजकीय दूरदृष्टी आणि अपेक्षेने नेतृत्व म्हणून गांधी कुटुंबियांवर विश्वास ठेवला आहे, तो खरा आहे हे त्यांना सिद्ध करायचे आहे.

देशातील राजकीय परिस्थितीचा विचार केला तर, २०१९ च्या निवडणुका या प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यासाठी लिटमस चाचणीसारख्या असतील.

इंदिरा गांधी यांनी १९५० च्या दशकात राजकारणात ज्या पद्धतीनं प्रवेश केला, त्या तुलनेत  राजीव गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी हे मात्र सक्रीय राजकारणात उतरण्याबाबत अत्यंत साशंक होते. इतकंच नाही तर प्रियंका गांधी २४ एप्रिल रोजी बरखा दत्त यांना दिलेल्या मुलाखतीत असं स्पष्टपणे म्हटलं होतं की, “राजकारणात माझी गरज का आहे याबाबत मला तरी अजून काही गवसलेले नाही, मात्र एक गोष्ट मी खात्रीने सांगू शकते की मला सक्रीय राजकारणात यायचे नाही. मी माझ्या सध्याचे आयुष्य ज्या तऱ्हेनं जगतेय त्यात मी प्रचंड आनंदी आहे. मला असं वाटतं की राजकारणाचे असेही काही पैलू आहेत, की त्याबाबतीत मी योग्य राजकीय व्यक्ती ठरू शकत नाही.”

खरे तर प्रियंका गांधी आपल्या वक्तव्यावर ठाम राहतील की नाही याबाबत काँग्रेस कार्यकर्ते त्या दिवसापासूनच साशंक होते. यावर्षीच्या जेव्हा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जेव्हा प्रियांका गांधी यांच्याकडे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या महासचिवपद आणि पूर्व उत्तर प्रदेशाच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय जाहीर झाला, तेव्हा याच कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले होते. ही घोषणा आगामी लोकसभा निवडणुकांना केवळ तीन महिनेच उरले असताना करण्यात आली. खरे तर भाजपाच्या नेतृत्वाखालच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला आणि तिसरी आघाडी स्थापन करून काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्तेत येण्याची स्वप्न पाहात असलेल्यांना धक्का देण्यासाठीच प्रियंकांबाबतची ही घोषणा इतक्या उशिरा करण्यात आली.

प्रियंका गांधी यांच्यासमोर काय आव्हानं आहेत?

यूपीएच्या २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या काळात राहुल गांधी यांच्या राजकीय जबाबदारीच्या व्याप्तीत फारशी वाढ झाली नव्हती. याऊलट या काळात एका आश्वासक नेत्याऐवजी राहुल गांधी यांची एक गोंधळलेले, अडेलतट्टू आणि बिलकूल गांभीर्य नसलेलं राजकीय व्यक्तीमत्व अशी नकारात्मक प्रतिमा निर्माण झाली. या पार्श्वभूमीचा विचार केला तर राहुल गांधी यांना ते एक विश्वासार्ह, कोणत्याही वेळी उपलब्ध असलेले राजकारणी आहेत, असा स्वतःबद्दलचा विश्वास आपल्याच पक्षसहकाऱ्यांमध्ये निर्माण करावा लागेल. त्याशिवाय त्यांच्यामध्ये भाजपाला पराभूत करण्याची क्षमता आहे हे देखील राहुल यांना दाखवावे लागेल. या गोष्टींचा विचार केला तर सरत्या वर्षात ११ डिसेंबर रोजी छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसनं भाजपाचा स्वबळावर केलेला पराभव ही राहुल गांधी यांच्या नेतृत्वगुणांवरचा विश्वास वाढवणारी घटना ठरल्याचे निश्चितच म्हणता येईल.

उत्तर प्रदेशातल्या वाराणसीचं प्रतिनिधित्व करत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गोरखपूरमध्ये वर्चस्व असलेले उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मार्ग खडतर करणे,  ही २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रियंका गांधी यांच्यावरची मोठी जबाबदारी असणार आहे. जर प्रियंका गांधी या दोन्ही नेत्यांना पूर्वीय उत्तर प्रदेशातच जखडून ठेवण्यात यशस्वी ठरल्या, तर लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराच्या शेवटच्या आणि महत्वाच्या टप्प्यात, देशाच्या इतर भागांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या सारख्या खंद्या आणि प्रभावी प्रचारकांचा भाजपाला फारसा उपयोग करून घेता येणार नाही. काँग्रेस उत्तर प्रदेशात चांगला प्रभाव दाखवू शकली तर भाजपाच्यादृष्टीनं ती मोठी डोकेदुखी ठरणार आहे. कारण देशाच्या राजकारणाच्यादृष्टीनं सर्वाधिक घडामोडींचे आणि महत्वाचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात मोठं यश मिळवू अशी भाजपालाही आशा आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.