-
CENTRES
Progammes & Centres
Location
गेल्या वर्षात सर्रासपणे पसरवलेल्या चुकीच्या माहितीमुळे सरकार आणि आरोग्य यंत्रणेबद्दल लोकांमध्ये अविश्वासाची भावना निर्माण झाली आहे.
२५ मार्च २०२०. भारतात सर्वात मोठा लॉकडाऊन लागू करण्यात आला. ११ महिने आणि जवळपास ११ दशलक्ष कोरोना रुग्ण. त्यानंतर भारत हा कोविड १९ वरील लशीचा सर्वात मोठा पुरवठादार ठरलेला जगातील एकमेव देश आहे. त्याचवेळी अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांनाही (एलएमआयसी) स्वदेशी लस देत असल्याने भारताचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. दुसरीकडे मायदेशात आपण खडतर आव्हानाला सामोरे जात आहोत. त्यामुळे लशीची अनिश्चितता आणि त्याबाबतच्या शंकाकुशंकांवर मात करायची आहे.
१६ जानेवारी २०२१ रोजी भारतात लसीकरण मोहीम सुरू झाली. देशभरातील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना (HCW) लस देण्यात आली. १९ फेब्रुवारीपर्यंत भारतात १०.७२ दशलक्ष लशींचे डोस देण्यात आले आहेत. भारत सरकारने १ मार्चपासून लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली. देशभरात सरकारी आणि खासगी केंद्रांवर लस उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, उपचारांपेक्षा प्रतिबंध घालणे अधिक चांगले. विशेषतः आजार बरा होत नसेल तर. कोविड १९ मधील प्रमुख समस्या म्हणजे, गुणकारी, नेमके उपचार यांचा अभाव. विविध प्रकारच्या औषधांचा वापर करण्यात आलेला आहे आणि काहींची चाचणी घेतली जात आहे. ज्यात काही मोजकीच औषधे परिणामकारक ठरलेली आहेत. नवीन येऊ घातलेली औषधे विकसित होत आहेत आणि काहींची चाचणी सुरू आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या वाढत आहे. लस ही महामारीच्या काळात कोविड १९चा संसर्ग रोखण्याचे प्रमुख साधन बनले आहे.
संसर्ग रोखणे हे लशीचे प्रमुख उद्दिष्ट नसून, गंभीर संसर्ग रोखणे हे लसीकरणाचे दुसरे प्रमुख उद्दिष्ट आहे. लस टोचून घेतल्यानंतरही संसर्ग होण्याची शक्यता खूपच कमी असली तरी, सर्वांमधील संसर्ग रोखू शकणार नाही, ही सुद्धा शक्यता आहे. पण एक फायदा हा आहे की, एखाद्या व्यक्तीला लस टोचून घेतल्यानंतरही संसर्ग झाला असेल तर, तो सौम्य असेल. याचाच अर्थ असा की, रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या, व्हेंटिलेटर्स, आयसीयूमधील दाखल होण्याचे प्रमाण, महागडी औषधे, आजारातून बरे झाल्यानंतर त्याचे दीर्घकाळ होणारे परिणाम आणि मृत्यूमध्ये होणारी वाढ रोखणे होय. अशा पद्धतीने लशी या आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि रोगराईचा लोकसंख्येवरील ताण कमी करतात. कमीत कमी समस्यांसह सौम्य संसर्गावर घरी उपचार केले जाऊ शकतात.
अलीकडेच केलेल्या अभ्यासानुसार, नैसर्गिक संसर्गापासून पाच ते आठ महिन्यांपर्यंत रोगप्रतिकार शक्ती बचाव करते. त्यानंतर एखाद्या व्यक्तीला पुन्हा संसर्ग होऊ शकतो, जसा अनेकांना पुन्हा संसर्ग झालेला आहे, हे अहवालातून स्पष्ट झाले आहे. लसीकरणाच्या माध्यमातून रोगप्रतिकारशक्ती बराच काळ टिकून राहील, असे अपेक्षित आहे. देशात वेगाने लसीकरण मोहीम राबवल्यास समूह रोगप्रतिकारशक्ती वाढवता येईल, अशा प्रकारे महामारीचा फैलाव आणि परिणाम नियंत्रित करता येतो. कोविड १९ चा झपाट्याने होणारा संसर्ग आणि त्यामुळे मृत्यूचे प्रमाण, तसेच गंभीर आर्थिक परिणाम विचारात घेता, समूह प्रतिकारशक्तीच्या माध्यमातून संभाव्य उद्दिष्टे साध्य करता येऊ शकत नाहीत.
काय आहे हर्ड इम्युनिटी? सोप्या आणि साध्या शब्दांत स्पष्ट करायचे झाले तर, समूहातील संसर्गाविरोधात एकत्रित संरक्षणाचे उपाय. ज्यावेळी प्रत्येकाला संसर्गाची लागण होत असते, त्यावेळी विषाणू झपाट्याने फैलावतो. जास्तीत जास्त लोक रोगप्रतिकारक्षम होतात, तेव्हा समूहात विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता खूप कमी असते. त्यानंतर ते कमी होत जाते.
प्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांमध्ये (निळा) संसर्गाचा (लाल) फैलाव कसा होतो आणि जास्तीत जास्त लोकांनी लस (हिरवा) घेतल्यास तो कसा कमी होतो, हे या खाली दिलेल्या कृतीचित्रामधून दिसते.
लोकांमध्ये संसर्ग फैलावू न देता लसीकरणाने आपल्याला सामूहिक प्रतिकारशक्ती वाढवता येते.
या महामारीला वर्षभरापेक्षा अधिक काळ लोटला आहे. त्याची तीव्रता कमी होताना दिसत नाही. फेब्रुवारी २०२० पासून जगात कोरोना रुग्णांची संख्या १११ दशलक्ष झाली आहे, तर जवळपास २.५ दशलक्ष मृत्यूंची नोंद झालेली आहे. वेगवान लसीकरण मोहिमेमुळे वाढणाऱ्या रुग्णसंख्येला आळा घालता येईल आणि महामारीची तीव्रता स्थानिक पातळीवरील समूहामध्ये कमी करता येईल आणि अधिक सोप्या पद्धतीने व्यवस्थापन करता येऊ शकते.
म्हणूनच, लस टोचून घेणे हा चांगला पर्याय आहे. लस कशी काम करते? लशींमध्ये सार्स-कोव्हि-२ (SARS-CoV-2) विषाणूचा एक भाग असतो किंवा विषाणू त्यात निष्क्रिय स्वरूपात असतो, ज्यामुळे कोणताही आजार होऊ शकत नाही. आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्तीच्या यंत्रणेला विषाणूचे अनावश्यक बाह्य कण ओळखण्यासाठी प्रवृत्त करण्याचे काम करते. ज्यामुळे बचाव होतो. प्रत्येक वेळी आपल्या शरीरात विषाणूला रोखणारी प्रतिकारशक्ती निर्माण होते. या लशींच्या असंख्य मानवी चाचण्या घेतल्या जातात आणि त्या सुरक्षितता, रोगप्रतिकारक क्षमता (रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यास सक्षम) आणि कार्यक्षमता आहे का याचे मूल्यांकन करून त्याचा वापर मोठ्या प्रमाणात लोकांवर केला जाऊ शकतो का, याची खात्री करून घेतली जाते.
सर्व लशी या सध्या दिल्या जात आहेत. भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन दिली जाते. या लशींचे दोन डोस दिले जातात. दोन डोस चार आठवड्यांच्या कालावधीत दिले जातात. दोन्ही डोस अत्यंत आवश्यक आहेत. एक डोस घेतल्याने पूर्णपणे प्रतिकारशक्ती वाढणार नाही.
लसीकरण म्हणजे तात्काळ संरक्षण असा त्याचा अर्थ होत नाही. एकदा लस टोचून घेतल्यानंतर प्रतिकारशक्ती प्रणालीला संरक्षण देण्यासाठी किमान १० ते १४ दिवसांचा कालावधी लागतो. म्हणजेच लसीकरणानंतर तात्काळ या कालावधीत संसर्ग होऊ शकतो. म्हणून लस काहीच काम करत नाही, असा त्याचा अर्थ होत नाही.
“लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर देखील पुरूष किंवा महिलेला पुन्हा संसर्ग झाला, ” असा वृत्तांतून दावा केला जातो, त्यावेळी त्यात काही काळजी करण्यासारखे नाही हे समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. याचा अर्थ असा नाही की, लशी या परिणामकारक नाहीत. याचा अर्थ असा की, आपली प्रतिकारशक्ती प्रणाली आहे, ती प्रतिकारशक्तीच्या प्रतिसादावर काम करत आहे. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग आवश्यक आहे, हे देखील कारण आहे. लसीकरणाची स्थिती काहीही असो, मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवणे या दोन्हीही गोष्टी संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी गरजेच्या आहेत. त्या विषाणूपासून संरक्षण करणाऱ्या लक्ष्मणरेषा आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे, लशींमुळे कोविड १९ चा संसर्ग होणार नाही. त्या संसर्गाचा फैलाव करण्यास अक्षम असतात.
लस टोचून घेण्यास अजूनही कचरतात. त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे, लसीकरणानंतर होणाऱ्या दुष्परिणामांची भीती. कोणतीही लस घेतली तर, त्याचे किंचित दुष्परिणाम जाणवणे अपेक्षितच असते. लस घेतल्यानंतर एकदा तरी अनुभव आलेला असावा.
– डोकेदुखी
– इंजेक्शन टोचलेल़्या ठिकाणी दुखणे
– मांसपेशी दुखणे
– ताप
– थकवा
– थंडी
– सांधेदुखी
लसीकरणानंतर अशा प्रकारचे दुष्परिणाम होणे सहाजिकच आहे. आणि त्यावर उपायही करता येतात. ज्यांना अॅलर्जी आणि अॅनाफिलिक्टिक्स (तात्काळ म्हणजे काही मिनिटांतच अॅलर्जी, ती जिवघेणीही असू शकते) चा त्रास होतो त्यांना लस टोचून घेण्याची भीती वाटू शकते किंवा ते त्याबाबत साशंक असतात. त्यामुळे लस निर्मात्यांनी अॅलर्जी /एनाफिलॅक्सिसचा त्रास असलेल्यांकरिता विपरित संकेत देणारी यादीच जाहीर केलेली आहे. आरोग्य क्षेत्रातील अनेक कर्मचाऱ्यांनी, ज्यांना अशा प्रकारचे त्रास असल्याचा पूर्वइतिहास आहे, त्यांनी स्वेच्छेने लस घेतलेली आहे. आणि त्यांना कमी प्रमाणात दुष्परिणाम जाणवले असल्याचे दिसून आले. लसीकरणाच्या प्रक्रियेनुसार, लसीकरणानंतर संबंधितांना काही तात्काळ साइड इफेक्ट्स झाले तर, त्यावर लगेच उपचार व्हावेत, यासाठी ३० मिनिटे देखरेखीखाली ठेवण्यात येईल.
भारतात सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने तयार केलेल्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकने तयार केलेल्या कोव्हॅक्सिनच्या वापराला मंजुरी देण्यात आलेली आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन यांनी लशीची माहिती देणारे पत्रक प्रसिद्ध केले आहे. ज्यात लस टोचून घेण्यापूर्वी त्यासंबंधीची सर्व माहिती असणे आवश्यक आहे.
विषाणू, विशेषतः आरएनए (RNA) विषाणू. ते नेहमीच बदलत राहतात. सार्स कोव्हि -२ (SARS-Cov-2) विषाणूबाबतही आधी हेच झाले होते. तर, काय आहे हे उत्परिवर्तन आणि त्यांचे परिणाम?
हे उत्परिवर्तन विषाणूला सहजतेने प्रसारित आणि बाधित करते आणि शरीराच्या रोगप्रतिकारक प्रणालीद्वारे ते नष्ट करण्यास किंवा निष्क्रिय होण्यास प्रतिकार करते. याचा अर्थ असा की, हा संसर्ग जास्त लोकांना झाल्याने तो अधिक वेगाने पसरतो. ब्राझील आणि ब्रिटनमधील बाधितांची वाढती संख्या हा त्याचा पुरावा म्हणून देता येईल. या विषाणूंच्या नवीन प्रकारांची उत्पत्ती ही मूळतः ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये झाली असली तरी, आता भारतासह इतर देशांतही आता तो आढळून येत आहे. हे नवीन प्रकार प्रयोगशाळांमध्ये यशस्वीरित्या विलग आणि त्यांच्याविषयी अभ्यासपूर्ण माहिती मिळाली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या लसींवर झालेल्या प्राथमिक अभ्यासानुसार, पॅरेंटल व्हायरसच्या तुलनेत नवीन विषाणूंच्या प्रकाराविरोधात त्याचे क्रिया बऱ्याच अंशी कमी झाल्याचे दिसून आले आहे.
फायझर, मॉडर्ना, ऑक्सफोर्ड-एझेड आणि भारत बायोटेक या चार लस निर्मात्यांकडील प्री-प्रिंटवरून दिसून येते की, सध्याच्या लशी पॅरेंटल व्हायरसच्या तुलनेत बी-१.१.७ यूकेच्या प्रकाराविरोधात किंचित परिणामकारक आहेत. दक्षिण आफ्रिकेतील बी.१.३५१ हा प्रकार चिंताजनक आहे. जो उत्परिवर्तनाने प्रतिकारशक्ती कमकुवत करण्याचे काम करत असल्याचे म्हटले जाते. सध्याच्या लशींनी त्याची परिणामकारक क्षमता बरीचशी कमी झालेली आहे. प्रतिकारशक्ती कमकुवत होणे म्हणजे, विषाणू शरीराद्वारे तयार झालेली प्रतिकारक्षमता कमी आणि नष्ट होऊ शकते. म्हणूनच, विषाणूला नष्ट करण्याची सध्याच्या लशींची क्षमता कमी झालेली आहे. लशी आणि नव्या प्रकारांवरील संशोधनानुसार, याबाबत अधिक माहिती उपलब्ध होईल.
गेल्या वर्षात सर्रासपणे पसरवलेली चुकीची माहिती, बोगस वृत्त आणि कटकारस्थानाने आपापल्या परीने मांडलेले तर्कवितर्क यांचा प्रसार यामुळे सरकार आणि आरोग्य यंत्रणेबद्दल लोकांमध्ये अविश्वासाची भावना निर्माण झाली आहे, असे दिसून आले. अशात कोविड-१९ वरील लशींसंबंधी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. तरीही, कोविड १९ आणि विषाणूच्या नव्या प्रकारांचा जगभरात फैलाव होत आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. आणि तो पुढे बराच काळ पसरणार आहे.
त्यामुळे मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा. लस घ्या.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Dr Haryax Pathak is a doctor from Vadodara. He is a hobbyist photographer and writer and an advocate for Creative Pedagogical Practices. His other interests ...
Read More +