Author : Anupam Singh

Published on Apr 01, 2020 Commentaries 0 Hours ago

आपली आरोग्यव्यवस्था कशी बदलणे गरजेचे आहे, याचे झणझणीत अंजन कोरोनाने घातले आहे. अशा साथीच्या आजारांना रोखण्यासाठी आरोग्याचे हे नवे धडे गिरवावेच लागतील.

कोरोनाने शिकविलेले आरोग्यधडे

भारत आजघडीला कोविड-१९ या साथीच्या आजाराच्या तिसऱ्या टप्प्याजवळ पोहचला आहे. या पार्श्वभूमीवर आता आपण आपल्या आरोग्यव्यवस्थेचे संघटन कसे करावे, तसेच प्रशासकीय आणि वैद्यकीय उपचार पद्धतींच्या पातळीवर कशाप्रकारचे धोरण राबवावे, याबाबत इथे चर्चा करणार आहोत. कोरोना विषाणूपासून होणाऱ्या या आजाराने आपली आरोग्यव्यवस्था कशी बदलणे गरजेचे आहे, याचे झणझणीत अंजन घातले आहे. या आणि भविष्यातील अशा साथीच्या आजारांना रोखण्यासाठी हे आरोग्यधडे गिरविणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

आरोग्यसेवेचे संघटन

i. ताप / श्वसनाचे विकार यांसाठी स्वतंत्र दवाखाने

ताप किंवा श्वसनाचे विकार यांसाठी स्वतंत्र दवाखाने असणे आवश्यक आहेत. खरे तर हे चीन आणि ऑस्ट्रेलियामध्ये अनेक ठिकाणी ही उपाययोजना याआधीच वापरात आणलेली आहे. याच्याही पुढे जाऊन टेलिमेडिसिन (दूरसंवाद उपचार पद्धती) आणि प्रशिक्षित परिचारकांनी मांडलेल्या गणितीय अंदाज पद्धतीचा वापर करूनही उपचार करता येतील. यामुळे रुग्णाचा डॉक्टरांशी थेट संपर्क येणार नाही आणि ते इतर बाबींसाठी उपलब्ध होऊ शकतील.

ii. विशेष आपत्कालीन दक्षता विभाग

सर्व निवडक ऑपरेशन थिएटर मोकळी करून घ्यावीत, आणि संसर्गजन्य न्युमोनिआ / कोविड१९ साठी स्वतंत्र अतिदक्षता विभाग स्थापन करावेत. यामुळे एकामुळे दुसऱ्याला होणारा संसर्ग टाळता येऊ शकेल. इनट्यूबेशन (शरिरामध्ये नलिका टाकण्याची प्रक्रिया) आणि व्हँटिलेशन (वायुवीजन- कृत्रीम श्वसन यंत्रणा) तज्ज्ञांनी इतर आरोग्य सेवकांना त्याबाबतचे प्रशिक्षण दिले पाहिजे. गंभीर स्वरुपाचे आजार असलेले रुग्ण संक्रमणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असतात, त्यामुळेच कोविड१९ या आजाराची लागण झालेल्या गंभीर स्थितीतल्या रुग्णाला कोविड अतिदक्षता रुग्णालयांमध्ये पाठवतांना हब आणि स्पोक मॉडेलचा अवलंब करायला हवा.

iii. टेलिमेडिसिन (दूरसंवाद उपचार पद्धती)

टेलिमेडिसिनचा सुयोग्य वापर व्हायला हवा. या पद्धतीचा अवलंब करून ज्यांना श्वसनविषयक तक्रारी नाहीत मात्र ज्यांची नियमित काळजी घेणे गरजेचे आहे, अशा रुग्णांच्या उपचार पद्धतीचं व्यवस्थापन टेलिमेडिसिनद्वारे केले पाहीजे. यामुळे मायोकार्डिअल (हृदयाशी संबंधित आजार) आणि झटका (स्ट्रोक) येण्याची शक्यता असलेल्या रुग्णांना कोविड१९ च्या संक्रमणापासून दूर ठेवता येऊ शकते.

iv. अद्ययावात माहिती प्रसारण फलक (Real-time dashboards)

योग्य माहिती हे देखील साथीच्या आजारांना रोखणारे महत्त्वाचे औषध आहे. लोकापर्यंत आवश्यक ती सर्व माहिती अद्ययावत आणि सोपेपणाने लोकांपर्यंत पोहचल्यास गोंधळ टाळता येतो. एखाद्या परिसरात ताप / श्वसनविषयक आजारांवरची उपचार केंद्र किती आहेत याची अद्ययावत आकडेवारी केंद्रीय माहिती फलकावर प्रसारित केली केली पाहिजे. यातील काही उपाचार केंद्र चाचणी, एकांतवास आणि विलगीकरणासाठी वापरात आणली पाहिजेत. (दोनएक आठवड्यांचा कालावधी किंवा नियमीत संचारबंदीच्या काळात काहीएक दिवस आड अशा रितीने हे धोरण राबवता येऊ शकते).

v. प्रशिक्षण

निर्जंतुकीकरण, गंभीर स्वरुपातल्या रुग्णांची सेवा [आंतरनलिका व्यवस्थापन (IV line), शरिरामध्ये नलिका टाकण्याची प्रक्रिया(intubation), आणि कृत्रीम श्वसन व्यवस्था] यांबाबतीतले छोट्या कालावधीचे प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या प्रमाणात हाती घ्यायला हवेत. सर्व भूलतज्ञ्न आणि गंभीर स्थितीतल्या रुग्णांची काळजी घेणारे रुग्णसेवक कोविड१९ या आजाराने बाधितांसाठी शहरात तयार केलेल्या केंद्रामध्येच उपलब्ध असतील याची सुनिश्चिती करायला हवी.

vi. रुग्णामधली आजाराची तीव्रता लक्षात घेऊन विविध उपचारपद्धतींचा अवलंब करणे

लोकांची मोठ्या प्रमाणातली ये जा टाळायची असेल तर त्यासाठी जिल्ह्यात सर्वत साधारण तापासाठीची उपचार केंद्र ( मोहल्ला क्लिनिकप्रमाणे) समप्रमाणात उपलब्ध करून द्यायला हवीत. (अशा उपचार केंद्रांमध्ये पीसीआरही देता येईल). ज्यांना कोविड१९ हा आजार झाला आहे, पण तो फारच सौम्य स्वरुपातला आहे (सुमारे ८० टक्के प्रकरणे अशीच सौम्य स्वरुपाची असतात, ज्यात आजाराची लागण झालेली असली तरी देखील, श्वसनाचा त्रास होत नाही तसेच इतर लक्षणेही सौम्य असतात) अशा रुग्णांना छोट्या रुग्णालयांमध्ये किंवा किंवा मध्यवर्ती विलगीकरण कक्षांची सोय असलेल्या ठिकाणी पाठवायला हवे.

त्यानंतर साधारणतः मध्यम स्वरुपाची तीव्रतेचे रुग्णांना (साधारणतः १०-१५ टक्के रुग्ण या प्रकारात येतात, त्यांच्या इतर लक्षणांसोबत श्वसनाचा त्रासही जाणवतो.) जिल्हा रुग्णालयांमध्ये, किंवा ७०-१०० खाटांच्या सोयीसह कोविड१९ साठी स्वतंत्र एकांतवास कक्षांची सोय असलेल्या खाजगी रुग्णालयांमध्ये पाठवले पाहिजे. आणि कृत्रिम श्वसन व्यवस्था म्हणजेच व्हेंटिलेटरची आवश्यकता असलेल्या रूग्णांना कोविड१९ची लागण झालेल्या आणि गंभीर स्थितीतल्या रुग्णांसाठीच्या विशेष केंद्रात पाठवले पाहिजे. (अशा रुग्णांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या साधारणतः ५-१० टक्क्यांच्या आसपास आहे.

त्यांच्यासाठी विशेष केंद्र सध्याची शासकीय रुग्णालयांना परावर्तीत करून, किंवा ७५०-१००० खाटांची सोय असलेल्या मोठ्या कॉर्पोरेट रुग्णालयांमध्ये निर्माण केली जाऊ शकतात.) अशा केंद्रांमध्ये पुरेशा प्रमाणात कृत्रीम श्वसन यंत्रणांसह, गंभीर स्थितीतल्या रुग्णांची सेवा करणाऱ्या तज्ञ व्यक्ती उपलब्ध असायला हव्या. यामुळे उलपब्ध स्त्रोत आणि तज्ञांची नेमकी गरज लक्षात घेऊन रुग्णांना वेगवेगळे ठिकाणी ठेवणे सोपे जाऊ शकेल. इटलीचा अनुभव पाहता, सहजच लक्षात येऊ शकेल की या आजाराची रुग्णामधली तीव्रता लक्षात घेऊन वेगवेगळी उपचारपद्धती अवलंबायची सोय उपलब्ध नसेल तर मोठा अनर्थ घडू शकतो. अशाच रितीने वुहानमध्ये कोविड१९ बाधित रुग्णांना इतर रुग्णांसोबत ठेवल्याने उद्भवलेल्या धोकाही आपण सर्वांनी पाहिलाच आहे.

प्रशासकीय दृष्टिकोनातून करायच्या उपाययोजना

i. खरेतर हवेतील उष्णता आणि आर्दतेमुळे कोविड१९या आजाराच्या प्रसार मंदावू शकतो, किंवा रोखला जाऊ शकतो, याबाबत फारसे पुरावे उपलब्ध नाहीत किंवा अत्यंत मर्यादित आहेत. मात्र तरीदेखील सगळ्याच सार्वजनिक ठिकाणी वातानुकुलीत यंत्रे बंद करून ठेवली पाहिजेत आणि हवेतली आर्द्रता वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

ii. रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाण्यापासून परावृत्त केले पाहिजे. त्यासाठी अशा सर्व मजूरांसाठी तात्पुरत्या किमान वेतनाची सोयही उपलब्ध करून द्यायला पाहीजे. कारण अशा कामगारांमुळे ग्रामीण भागांमध्ये जिथे फारशा आरोग्यसुविधा उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी या आजाराचा फैलाव होण्याची शक्यता आहे. आणि असे घडले तर त्यामुळे परिस्थिती अधिकच कठिण होण्याचीही शक्यता आहे.

iii. स्थानिक पातळ्यांवर संचारबंदी लागू करून, या काळात ज्यांच्यामध्ये या आजाराची लक्षणे दिसत आहेत अशांचा शोध घ्यायला हवा, तसेच काही प्रमाणात चाचण्याही करायला हव्यात.

iv. संसर्गाचे प्रमाण वाढू लागले असल्याचे, किंवा बाधित असलेली व्यक्ती कळत न कळतपणे अनेकांच्या संपर्कात येत असल्याची परिस्थिती निर्माण होत असल्याचे दिसू लागताचक्षणी मध्यवर्ती विलगीकरणाचा नियम सक्तीने लागू करण्याची गरज असले. घरातच विलगीकरणात ठेवलेल्या व्यक्ती नियमांचे पालन करत नसल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशावेळी प्रशानाने सर्व संशयित घरातच विलगीकरणात राहतील असा विश्वास ठेवू नये आणि अधिकची सक्ती दाखवावी. याशिवाय आपण केवळ बाधित देशांमधून भारतात परतलेल्या लोकांना विलगीकरणात राहण्याची सूचना करण्याची चूक केली आहे, ती चूक सुधारत सर्वच देशांतून आलेल्या नागरिकांना सक्तीने विलगीकरणात ठेवले पाहिजे.

v. सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या राज्य किंवा शहरांमध्ये मध्ये संचारबंदीसदृश्य बंदी लागू करावी.

vi. सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या राज्यांमधून इतर ठिकाणी होणारी स्थानिक वाहतूक बंद करून इतर शहरे आणि राज्यांमध्ये होणारा फैलाव रोखावा.

vii. छोट्या स्वरुपातले स्वच्छता अभियान: नागरिकांनी आपली घरे दिवसातून किमान दोन वेळा स्वच्छ / निर्जंतूक करावित.

viii. जास्त लोकसंख्या असलेल्या परिसरांमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये तापावर उपचार करणारी उपचार केंद्र उघडली गेली पाहिजेत तसेच अशा ठिकाणी सातत्याने वैद्यकीय देखरेख देखील ठेवली पाहिजे. काही विशिष्ट औषधांचा वापर करून (क्लोरोक्विन डेरिव्हिटिव्ह्स, प्रोटिएज इनहिबिटर्स यांसारखी अनियत चाचण्यांमध्ये सकारात्मक परिणाम दाखवलेली औषधे) मोठ्या प्रमाणावर रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना / उपचार करण्याचा विचार करायला हवा. यासोबतच ज्या परिसरांमध्ये कमी उत्पन्न गटातील लोक राहतात अशा ठिकाणांचे सरकारने वेळोवेळी निर्जंतुकीकरण करायला हवे, तसेच या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना सरकारने मास्कचे मोफत वाटप करायला हवे.

ix. लोकांची नावे उघड न करता सरकारने ताजी आकडेवारी दर्शवणारे फलक लोकांना उपलब्ध करून द्यायला हवे, जणेकरून लोक हाँगकाँगमध्ये झाले, त्यानुसारच ज्या परिसरात या आजारानची लागण झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे, अशा परिसराशी संपर्क आणि संवाद टाळू लागतील.

औषधोपचाराच्या बाबतीत करायच्या उपाययोजना

i. लस: या आजाराला रोखणारी लस विकसित करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना प्रोत्साहन द्यायला हवे.

ii. चाचण्यांचा वेग वाढवणे:

वेगाने चाचण्या घेण्यासाठी बेएशियान प्रारुपाचा वापर केला जाऊ शकतो. यातुन प्राथमिक स्तरावर संसर्ग झाल्याचे मोठे प्रमाण दिसून येईल. या प्रक्रियेदरम्यान माहिती संकलनाचे प्रमाण कमीत कमी ठेवावे, जेणेकरून अनियत चाचण्यांचा आकडा जास्त फुगणार नाही, मात्र चाचण्या वेगाने घेता येऊ शकतील. अशा प्रकारच्या चाचण्या ज्या उपचार केंद्रात उपचार घ्यायला आलेल्यांची संख्या जास्त आहे तिथे घेतल्या जाऊ शकतात. अनेक अभ्यासांमध्ये अनियत चाचण्यांदरम्यान कीही विशिष्ट औषधे परिणामकारक ठरत असल्याचे दिसून आले आहे.

लोपीनवीर-रिटोनावीरचे संयुग तसेच हायड्रोक्लोरोक्वीन आणि क्रोलरोक्विन ही अशीच काही परिणाम साधू शकणारी जी तोंडावाटे दिली जाऊ शकतात. अर्थात हे तत्व जवळपास सर्वच औषधांना लागू असले, तरी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन सल्फेट हे औषध सर्वात सुरक्षित आणि परिणामकारक आहे. त्यामुळे हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या अनियत चाचण्या तातडीने सुरु करायला हव्या आहे. कारण हे औषध तुलनेने सुरक्षित आणि परवडणारेदेखील आहे. जोपर्यंत या चाचण्यांबाबतचे निष्कर्ष हाती येत नाहीत, तोपर्यत रोगप्रतिबंधासाठी सर्व आरोग्य कर्मचारी आणि बाधित रुग्णांनीही हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध घ्यायला हवे. खरे तर अमेरिकेत सध्या कोविड१९ या आजारावरच्या उपचारांदरम्यान तिथले आरोग्य कर्मचारी या औषधाचा वापर करू लागले आहेत.

iii. औषधांच्या किंमती:

या आजारावरची संभाव्य औषधे जीवनावश्यक म्हणून जाहीर करून त्यांच्या किंमती निश्चित करणे.

iv. उपचारांची तटबंदी / आजरांचा फैलाव रोखणे:

वर नमूद चाचण्या यशस्वी झाल्यास, नळाचे पाण्याद्वारे औषधे वितरित करण्याचा प्रयत्नही करून पाहायला हवा. कारण अशा परिस्थितीत, सार्वजनिक आरोग्याचे हित लक्षात घेऊन, मलेरिया, खुपऱ्या आणि कॉलरासारख्या आजारांविरोधात मोहीम सुरु करायला हवी आणि त्यासाठीच मोठ्या प्रमाणावर रोगप्रतिंबंधक उपाय करणे (क्लोरोक्विन, हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन) आणि उपचारांची तटबंदी उभी करणे आणि या आजारांचा फैलावर रोखणे अत्यंत गरजेचे ठरणार आहे.

v. सेरोलॉजीवर / रक्त चाचण्यांवर आधारित उपचारपद्धती:

भारत, चीन, दक्षिण कोरियामधल्या उपचारांनंतर बऱ्या झालेल्या रुग्णांच्या रक्ताचे नुमुने घेऊन ते वेगळे ठेवायला हवेत. (असे रुग्ण जे त्यांच्या रक्त आणि नमून्यांच्या चाचण्यांनंतर आजारापासून मुक्त झाले आहेत असे)अशा रुग्णांच्या पॅसिव्ह अँटीबॉडीजचा वापर आजाराचे निदान झाल्यानंतरच्या रोगप्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी केला जाऊ शकतो. सामान्यतः धनुर्वात आणि रेबीज सारख्या रोगांच्या उपचारांमध्ये ही पद्धत वापरली जाते.

खरे तर संयुक्तपणे योग्य उपचारपद्धतींचा अवलंब करणे, नाविन्यपूर्ण उपाययोजना राबवण्यासारख्या महत्वाच्या निर्णयांचा अभाव आणि मूलतत्ववादी विचारपद्धती हे देखील सध्याचे एक मोठे संकट आहे. खरे तर जुनाट म्हटली जाणारी अचूक रोगनिदानाची पद्धत, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, आणि या महामारीविरुद्धच्या लढ्यात वैद्यकीय उपचारांसाठी अनेक देशांनी वापरलेल्या आणि प्रभावी ठरलेल्या पद्धतींचा अंतर्भाव एकत्रितपणे वापर करणे हीच आत्ताची सर्वाधिक मोठी गरज आहे.

एकीकडे नाविन्यपूर्ण उपाययोजना केल्या जात असताना, मास्क घालणे, हात धुणे, घराचे निर्जंतुकीकरण करणे तसेच माध्यमांमधून जनजागृतीच्या मोहीमा चालवणे या गोष्टीदेखील कोविड१९ या आजाराविरुद्धच्या लढ्यातल्या महत्वाच्या उपाययोजना आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.