Author : Manoj Joshi

Expert Speak Raisina Debates
Published on Mar 28, 2026 Updated 0 Hours ago

आधुनिक युद्धात थकवणारे युद्ध आणि अचूक प्रहार या दोन्ही पद्धतींचा समावेश असतो; मात्र यापैकी कोणतेही युद्ध विजयाची हमी देत नाही पण सामाजिक लवचिकता, अनुकूलता आणि माहितीवरील वर्चस्व हेच निर्णायक ठरतात.

शस्त्रे अत्याधुनिक, तरीही विजय अनिश्चित! आधुनिक युद्धात ‘माहिती’चं वर्चस्व

    अलीकडील काळात युद्धाच्या दोन प्रमुख प्रकारांचा उदय झाला आहे. पहिला प्रकार पारंपरिक स्वरूपाचा असला तरी युक्रेनमधील संघर्षाने त्याला नव्याने परिभाषित केले आहे. येथे प्रतिस्पर्धी गेल्या चार वर्षांपासून दीर्घकालीन युद्धात गुंतलेले आहेत, ज्यात मानवी जीवितहानी प्रचंड प्रमाणात झाली आहे आणि पायाभूत सुविधांचाही मोठा नाश झाला आहे. या रणांगणाने दाखवून दिले आहे की ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि व्यावसायिक तंत्रज्ञानावर आधारित लहान युनिट्सची रणनीती ही जड शस्त्रास्त्रांइतकीच महत्त्वाची ठरते.

    दुसरा प्रकार म्हणजे अमेरिका–इस्रायलचा दृष्टिकोन, जो 26 फेब्रुवारी पासून अधिक स्पष्ट झाला आहे. हा दीर्घ पल्ल्याच्या अचूक हल्ल्यांवर आधारित युद्धाचा नमुना आहे, ज्यात क्षेपणास्त्रे आणि बॉम्बर्सचा वापर केला जातो. या पद्धतीत हल्ला करणाऱ्यांची जीवितहानी अत्यल्प असते, पण विरोधकांसाठी ती अत्यंत विध्वंसक ठरते, जसे गाझा आणि इराणवरील अलीकडील हल्ल्यांमधून दिसून येते.

    हे दोन्ही प्रकार एकाच युद्धपद्धतीचे फक्त वेगवेगळे प्रकार नाहीत, तर लष्करी दडपशाही करण्याच्या मूलभूत दृष्टिकोनांमध्ये फरक दर्शवतात. या पद्धतींमध्ये शक्ती आणि राजकीय परिणाम यांच्यातील संबंध, तसेच खर्च आणि वेळ याबाबतची सहनशीलता वेगवेगळी आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धती आणि मर्यादा समजून घेणे हे कोणत्याही गंभीर संरक्षण नियोजनासाठी अत्यावश्यक बनले आहे.

    अमेरिकेसारख्या शक्तिशाली प्रतिस्पर्ध्याविरुद्धचे कोणतेही युद्ध अनिवार्यपणे असममित पद्धतीनेच लढावे लागते. अमेरिकेची “shock and awe” (शॉक अँड ऑ) रणनीती दीर्घ पल्ल्याच्या अचूक हल्ल्यांवर आधारित असून ती संपूर्ण वर्चस्व गाजवण्यावर लक्ष केंद्रित करते आणि त्यासाठी अत्यंत प्रगत व बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणालीची गरज असते. आतापर्यंत अशा प्रकारच्या हल्ल्यांविरुद्ध कोणत्याही देशाने पूर्णपणे यशस्वी चाचणी घेतलेली नाही, जरी 1999 मध्ये सर्बियाने काही प्रमाणात यूएस-नाटो हवाई दलाला आव्हान दिले आणि एक स्टेल्थ लढाऊ विमान पाडले होते.

    इराण युद्धात अमेरिकेसाठी एक महत्त्वाचा धडा म्हणजे इराक आणि अफगाणिस्तानातील अनुभव लक्षात घेता जमिनीवरील सैन्य (ग्राउंड फोर्स) पाठवण्याचे टाळणे. मात्र, यामुळे इराणवरील मोहिमेला पूर्णपणे आपल्या अटींवर समाप्त करण्याची त्याची क्षमता मर्यादित होते. जरी अमेरिकेने इराणच्या लष्करी क्षमतेचा मोठा भाग नष्ट केला आणि नेतृत्व कमकुवत केले, तरीही हॉर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण मिळवण्याचे मुख्य उद्दिष्ट अद्याप साध्य झालेले नाही. येथे इराणकडून समुद्री खाणी, जहाजविरोधी क्रूझ क्षेपणास्त्रे, ड्रोन, लहान पाणबुड्या, वेगवान बोटी आणि मानवरहित पाण्याखालील यंत्रणा अशा संमिश्र धोक्यांना सामोरे जावे लागत आहे. यात भौगोलिक फायदाही महत्त्वाचा आहे.

    इराणची असममित प्रतिक्रिया ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून आखातामधील शेजारी देश आणि इस्रायलवर हल्ले करून दिसून आली आहे. मर्यादित क्षेपणास्त्र साठ्यामुळे तो मुख्य प्रतिस्पर्धी इस्रायलवर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकत नाही, त्यामुळे युद्धाचा आर्थिक खर्च शेजारी देशांवर आणि जागतिक पातळीवर वाढवणे हे त्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. मात्र, या संघर्षात निर्णायक घटक म्हणजे इराणची सामाजिक लवचिकता किती टिकून राहते हे असेल. दीर्घकालीन अंतर्गत एकजूट टिकवून ठेवणे हीच अमेरिकेविरुद्ध यशस्वी होण्याची किल्ली ठरू शकते जसे अफगाणिस्तानात तालिबानने आणि त्याआधी व्हिएतनाममध्ये पाहायला मिळाले. तथापि, अलीकडील काळात इराणमध्ये अंतर्गत मतभेदही स्पष्ट झाले आहेत, ज्याची दखल घेणे आवश्यक आहे.

    तिसरा आयाम: कृत्रिम बुद्धिमत्तेचे एकत्रीकरण

    सध्याच्या दोन्ही मोहिमांमध्ये एक तिसरा महत्त्वाचा आयाम दिसून येतो, जो अजून पूर्णपणे स्पष्ट नसला तरी त्याचे धोरणात्मक महत्त्व झपाट्याने वाढत आहे. तो म्हणजे लक्ष्य निर्धारण प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर आणि सायबर ऑपरेशन्सचा शक्तिवर्धक म्हणून उपयोग.

    विश्वसनीय संकेत दर्शवतात की AI-आधारित लक्ष्य निर्धारण विशेषतः प्रोजेक्ट मेव्हन सारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून, जे मशीन लर्निंग वापरून निरीक्षण डेटा प्रक्रिया करून लक्ष्य यादी सुधारतात. जे सध्याच्या मोहिमांमध्ये वापरले गेले आहे. जर हे खरे असेल, तर लक्ष्य ओळखणे, वर्गीकरण करणे आणि प्राधान्य देणे या प्रक्रियेच्या वेगात आणि अचूकतेत मोठी गुणात्मक झेप घेतली आहे. AI मुळे सेन्सर-टू-शूटर सायकल कमी होते, ज्याचा परिणाम आक्रमक आणि संरक्षणात्मक दोन्ही ऑपरेशन्सवर होतो.

    सायबर क्षेत्रात, तेहरानमधील ट्रॅफिक कॅमेरे आणि मोबाईल नेटवर्कमध्ये इस्रायलने हस्तक्षेप करून प्रवेश मिळवल्याच्या बातम्यांवरून असे दिसते की सायबर ऑपरेशन्स केवळ व्यत्यय आणण्यासाठीच नव्हे, तर प्रत्यक्ष लक्ष्यभेदन्याच्या मोहिमेला सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे साधन बनले आहे. उच्च-मूल्य लक्ष्यांच्या हालचालींबाबत रिअल-टाइम माहिती मिळवून ती व्यापक ISR (इंटेलिजन्स, सर्व्हेलन्स, रिकनॉन्सन्स) प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आली. सायबर आणि प्रत्यक्ष ऑपरेशन्सचा हा संगम, अचूक मार्गदर्शित शस्त्रास्त्रांच्या उदयानंतर या क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा बदल मानला जाऊ शकतो.

    संरक्षण नियोजकांसाठी याचे परिणाम अत्यंत महत्त्वाचे आहेत. ज्या सैन्याची सर्वंकष पाळत ठेवली गेली आहे, ज्यांच्या संवाद प्रणालींमध्ये घुसखोरी झाली आहे आणि ज्यांच्या नेतृत्वाच्या हालचाली AI-आधारित विश्लेषणाद्वारे प्रत्यक्ष वेळेत ट्रॅक केल्या जात आहेत, अशा सैन्याला पारंपरिक शत्रूपेक्षा पूर्णपणे वेगळ्या प्रकारचा धोका निर्माण होतो. माहितीवरील वर्चस्वासाठीची लढाई ज्यात नेटवर्क्स, सेन्सर्स आणि AI प्रणालींवर नियंत्रण मिळवणे यांचा समावेश आहे. ती आता प्रत्यक्ष रणांगणातील लढाईपासून वेगळी राहिलेली नाही.

    तथापि, अजूनही अनेक गोष्टी अस्पष्ट आहेत. लक्ष्य निर्धारण प्रक्रियेत AI चा नेमका किती वापर झाला, सायबर ऑपरेशन्सनी घटनांच्या प्रवाहावर कितपत परिणाम केला आणि कोणती प्रतिकारक उपाययोजना वापरण्यात आली हे सर्व पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. दोन्ही बाजूंनी अशा क्षमतांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे, ज्या अद्याप अंशतःच उघड झालेल्या आहेत. त्यामुळे या संघर्षांचे विश्लेषण करताना विनयशीलता आवश्यक आहे, कारण दिसणारे चित्र हे प्रत्यक्ष कार्यपद्धतीचे संपूर्ण प्रतिबिंब नसू शकते.

    भारतासाठी शिकवण

    भारतासाठी या संघर्षांमधून थेट आणि महत्त्वपूर्ण शिकवण मिळते. भारताची रणनीतिक परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची आहे. भारताला दोन्ही प्रकारच्या युद्धपद्धतींमध्ये एकाच वेळी कार्य करण्याची तयारी ठेवावी लागते. गेल्या वर्षीच्या ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिले की अचूक प्रहार मॉडेल उपखंडातही प्रभावी आहे आणि भारताकडे हवाई शक्तीद्वारे पाकिस्तानच्या लष्करी ठिकाणांवर वर्चस्व मिळवण्याची क्षमता आहे. महत्त्वाचे म्हणजे, दोन्ही बाजूंनी नागरी पायाभूत सुविधांवर हल्ले टाळले यातून या प्रदेशातील अण्वस्त्र संबंधित तणावाची जाणीव आणि त्यातील वाढीव जोखमीचे भान दिसून येते.

    मात्र, भारताने आपली लष्करी रचना एका विशिष्ट धोका किंवा एका युद्ध मॉडेलभोवती मर्यादित ठेवू नये. पाकिस्तानविरुद्धची परिस्थिती, जी हवाई वर्चस्वाद्वारे हाताळता येऊ शकते, ती चीनकडून येणाऱ्या आव्हानापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. चीनसोबतचा संघर्ष दीर्घकालीन थकवणाऱ्या युद्धात परिवर्तित होऊ शकतो, जिथे युक्रेनमधील अनुभव जसे की मोठ्या प्रमाणावर संसाधने, औद्योगिक क्षमता, सामाजिक लवचिकता आणि एका तंत्रज्ञानावर अवलंबून न राहणे अत्यंत महत्त्वाचे ठरतील. दोन-आघाड्यांच्या रणनीतिक आव्हानाला सामोरे जाण्यासाठी भारताला अशी लष्करी रचना आणि धोरण विकसित करावे लागेल जे या दोन्ही परिस्थितींना विश्वासार्हपणे प्रतिसाद देऊ शकेल.

    कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि सायबर क्षेत्रामुळे या समीकरणात तत्परता नावाचा आणखी एक स्तर निर्माण झाला आहे. भारताने अमेरिका आणि इस्रायलसारख्या देशांप्रमाणे आक्रमक क्षमता विकसित करणे आवश्यक आहे, तसेच संरक्षणात्मक रचना मजबूत कमांड नेटवर्क्स, AI-प्रतिरोधक संवाद प्रणाली आणि सक्षम सायबर-प्रतिउत्तर क्षमता उभारणे गरजेचे आहे, जेणेकरून शत्रूला माहितीवरील वर्चस्व मिळवण्यापासून रोखता येईल. माहितीवरील वर्चस्वासाठीची लढाई आता दोन्ही प्रकारच्या युद्धपद्धतींमध्ये प्रभावी कारवाईसाठी पूर्वअट बनली आहे.

    भारत येथे दुर्लक्ष करू शकत नाही. भारतीय NavIC (नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन) उपग्रह प्रणाली ही ॲटॉमिक क्लॉक्स आयात करण्याच्या प्रक्रियेत आलेल्या अडचणींमुळे अडथळ्यांना सामोरे जात असल्याच्या बातम्या चिंताजनक आहेत. NavIC ही भारताची GPS ला पर्यायी प्रणाली असून तिचे संरक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण उपयोग आहेत, परंतु ती अद्याप पूर्णपणे कार्यान्वित झालेली नाही.

    निष्कर्ष

    दीर्घकालीन थकवणारे युद्ध आणि अचूक प्रहार या दोन पद्धती परस्परविरोधी नसून त्या एका विस्तृत स्पेक्ट्रमच्या दोन टोकांवर आहेत. प्रत्यक्ष संघर्षात परिस्थितीनुसार या पद्धती बदलत राहू शकतात, जे प्रारंभीच्या नियोजनाच्या गृहितकांना आव्हान देतात.

    युक्रेन युद्धातून मिळणारा धडा असा की, कागदावर सर्वात मजबूत सैन्य असूनही चुकीची योजना आणि अंमलबजावणी विजय मिळवण्यापासून रोखू शकते. तसेच, कोणतेही एक शस्त्र किंवा शस्त्रांचा प्रकार विजयाची हमी देत नाही. ड्रोनसारख्या तंत्रज्ञानातील नवकल्पना प्रतिस्पर्ध्यांकडून लवकरच समतोलीत केल्या जाऊ शकतात. त्यामुळे लष्करी संघर्षात खरा निर्णायक घटक म्हणजे सामाजिक लवचिकता आहे.

    दुसरीकडे, अचूक प्रहाराच्या पद्धतीत जमिनीवरील सैन्य न पाठवण्याचा निर्णय अल्पकालीन पर्याय जपतो, पण दीर्घकालीन परिणामांवर मर्यादा आणतो. AI-आधारित लक्ष्य निर्धारण आणि सायबर-सक्षम ISR हे या मॉडेलचे महत्त्वाचे घटक असले, तरी प्रतिस्पर्ध्याची असममित रणनीती आणि भौगोलिक फायदा यामुळे तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत सैन्यालाही सावध राहावे लागते. उदाहरणार्थ, हॉर्मुझ सामुद्रधुनीच्या संदर्भात, नाश करण्याची क्षमता म्हणजे नियंत्रण मिळवण्याची हमी नसते.


    मनोज जोशी हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे डिस्टिंग्विशड फेलो आहेत.

    The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.