भारताचा जागतिक वैद्यकीय पर्यटन केंद्र म्हणून उदय हा कमी खर्चिक आरोग्यसेवा, धोरणात्मक नवकल्पना आणि पारंपरिक उपचारपद्धती यांचा समन्वय दर्शवतो.
Image Source: Getty Images
आजच्या काळात, जिथे आरोग्यसेवेचे खर्च सतत वाढत आहेत आणि विकसित देशांमध्ये उपचारांसाठी प्रतीक्षा खूप आहे, तिथे अधिकाधिक रुग्ण परवडणाऱ्या आणि दर्जेदार उपचारांसाठी सीमापार प्रवास करत आहेत. यालाच वैद्यकीय पर्यटन म्हणतात. हे म्हणजे परदेशात जाऊन उच्च दर्जाचे आणि कमी किमतीत उपचार घेणे. रुग्ण जेव्हा आपल्या देशाबाहेर उपचार घेण्याचा निर्णय घेतो, तेव्हा मुख्यतः रुग्णालयांचा दर्जा आणि सेवा यावर तो निर्णय अवलंबून असतो. Medical Tourism Index (MTI) या निर्देशांकाद्वारे देशांचे आकर्षण, आरोग्यसेवा व्यवस्था आणि सेवा दर्जा यांच्या आधारे क्रमवारी ठरते. भारत MTI मध्ये 46 देशांपैकी 10 व्या क्रमांकावर आहे आणि 60 ते 90 टक्के खर्च वाचवणारे उपचार आंतरराष्ट्रीय रुग्णांना देतो. कॅनडा हा अमेरिका (US) जवळ असल्यामुळे आणि जागतिक दर्जाची आरोग्यसेवा देत असल्यामुळे पहिल्या क्रमांकावर आहे, तर सिंगापूर दुसऱ्या स्थानावर आहे.
जागतिक वैद्यकीय पर्यटनाचा बाजार 2021 मध्ये सुमारे ₹ 2.65 लाख कोटी होता, जो 2022 मध्ये वाढून सुमारे ₹2.97 लाख कोटी झाला. ही वाढ दरवर्षी 11.7 टक्के आहे. कोविड-19 आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्बंध आणि पुरवठा साखळी विस्कळीत झाली होती, तरीही या क्षेत्रात प्रचंड वाढ झाली आहे. अंदाजानुसार 2026 पर्यंत हा उद्योग सुमारे ₹4.51 लाख कोटी पर्यंत पोहोचू शकतो, ज्याचा Compound Annual Growth Rate (CAGR) 11.1 टक्के आहे. यावरून वैद्यकीय पर्यटनाचे वाढते महत्त्व आणि भारताची सकारात्मक भूमिका दिसून येते.
भारत वैद्यकीय पर्यटन क्षेत्रात आघाडीवर येण्यामागे 1990 च्या आर्थिक उदारीकरणानंतरची धोरणे आणि खासगी आरोग्य क्षेत्रातील प्रगती कारणीभूत ठरली. याच काळात मोठ्या खाजगी रुग्णालयांमध्ये परदेशी रुग्णांची संख्या वाढू लागली, विशेषतः दक्षिण आशिया, मध्यपूर्व, आफ्रिका आणि काही पाश्चिमात्य देशांतून. भारतातील उपचार तुलनेत स्वस्त असल्याने, 2002 च्या राष्ट्रीय आरोग्य धोरणात परदेशी रुग्णांच्या उपचाराला 'डिम्ड एक्सपोर्ट' म्हणून मान्यता देण्यात आली.
भारताकडे पात्र आणि इंग्रजी भाषिक डॉक्टरांची मोठी फौज आहे, प्रगत निदान सुविधा आहेत, आणि आधुनिक तसेच पारंपरिक (आयुर्वेद व योगासह) उपचारपद्धती उपलब्ध आहेत. ही सर्व वैशिष्ट्ये भारताला आंतरराष्ट्रीय रुग्णांसाठी अधिक आकर्षक बनवतात.
या धोरण बदलास ‘Heal in India’ या अभियानासारख्या उपक्रमांनी आणि वैद्यकीय प्रवासासाठी व्हिसा नियम सुलभ करून बळकटी दिली. जागतिक स्तरावर विश्वास निर्माण करण्यासाठी अनेक भारतीय रुग्णालयांनी Joint Commission International (JCCI) मान्यता घेतली. भारताच्या आरोग्यसेवा क्षेत्रात तज्ज्ञ डॉक्टर, इंग्रजीतील प्रावीण्य, प्रगत चाचणी सुविधा आणि आधुनिक तसेच पारंपरिक उपचार यामुळे जगभरातून लोक भारतात येऊ लागले. 2025 मध्ये भारताची आरोग्यसेवा थायलंड, सिंगापूर आणि तुर्की यांच्यासारख्या टॉप वैद्यकीय पर्यटन स्थळांइतकी सक्षम आहे, हे जागतिकीकरणामुळे शक्य झाले आहे.
भारतातील वैद्यकीय पर्यटन क्षेत्राने अपेक्षेपेक्षा वेगळी पण झपाट्याने वाढ अनुभवली आहे, आणि ही वाढ सरळ रेषेत न होता, अनेक मोठ्या बदलांमधून घडत गेली आहे. भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर टॉप 20 वेलनेस टुरिझम मार्केटमध्ये सातवे स्थान मिळवले असून, 560 लाखांहून अधिक प्रवास आणि अंदाजे 16.3 अब्ज डॉलर (अंदाजे ₹1.36 लाख कोटी) उत्पन्न मिळवले आहे. आशिया-पॅसिफिक क्षेत्रात भारताचा वेलनेस टूरिझमसाठी तिसरा क्रमांक आहे. मुंबई, चेन्नई, नवी दिल्ली, अहमदाबाद आणि बेंगळुरू या प्रमुख वैद्यकीय पर्यटन केंद्रांमध्ये समावेश होतो. पर्यटन मंत्रालयाच्या 2022 च्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय वैद्यकीय पर्यटकांपैकी पंजाबने 29.22% आणि महाराष्ट्राने 17.6% पर्यटक घेतले, तर तमिळनाडू (17.02%) आणि उत्तर प्रदेश (16.19%) हे देशांतर्गत वैद्यकीय प्रवासासाठी महत्त्वाचे गंतव्य होते. त्याच वर्षी भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांपैकी 21.2% पर्यटक वैद्यकीय कारणांसाठी आले.
मेडिकल टुरिझम असोसिएशननुसार भारत टॉप 10 देशांमध्ये गणला जातो आणि तो हळूहळू जागतिक वैद्यकीय पर्यटन नकाशावर आपली जागा मजबूत करत आहे. बांगलादेश भारतासाठी सर्वाधिक वैद्यकीय पर्यटकांचा स्रोत देश आहे आणि 2023 मध्ये एकट्या बांगलादेशातून आलेल्या पर्यटकांची संख्या 4.49 लाखांहून अधिक होती, जी एकूण पर्यटकांपैकी 54% आहे. 2016 ते 2019 दरम्यान (आकृती 1), वैद्यकीय पर्यटनासाठी परदेशी पर्यटकांच्या आगमनात सातत्याने वाढ झाली - 4.27 लाखांवरून 6.97 लाखांपर्यंत. मात्र 2020 मध्ये कोविड-19 मुळे ही संख्या 1.83 लाखांवर घसरली. तरीही, 2019 मध्ये पर्यटनाशी संबंधित परकीय चलन कमाई ₹2.11 लाख कोटींवर पोहोचली होती.
आकृती 1: वैद्यकीय कारणांसाठी वर्षानुसार परदेशी पर्यटकांचे एकूण आगमन (2016-2024)

स्रोत: Data compiled from the Bureau of Immigration (BOI), *: Provisional
भारताच्या वैद्यकीय पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी अनेक योजना राबवल्या गेल्या, ज्यात नॅशनल स्ट्रॅटेजी फॉर मेडिकल अँड वेलनेस टुरिझम, ई-मेडिकल व्हिसा, परदेशात जाहिरात आणि मेडिकल अँड वेलनेस टुरिझम बोर्ड यांचा समावेश होता. पर्यटन मंत्रालयाने मार्केट डेव्हलपमेंट असिस्टन्स (MDA) योजनेअंतर्गत परदेशातील कार्यक्रमांसाठी 2018–19 मध्ये ₹10.2 लाख आणि 2020-21 मध्ये इथिओपियासाठी आरोग्य मोहीमेसाठी ₹7.5 लाख मंजूर केले. कोविडनंतर या क्षेत्राने वेगाने उभार घेतली आणि 2023 मध्ये फ्री ट्रॅव्हल ऑथरायझेशनअंतर्गत 5.4 लाखांहून अधिक वैद्यकीयकारणासाठी आगमन झाले, ज्यात मागील वर्षाच्या तुलनेत 40% वाढ झाली. 2025 च्या लोकसभा अहवालानुसार, अधिकृत मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल (MVT) पोर्टल सुरू करणे, ई-व्हिसाचा विस्तार आणि टियर-2, टियर-3 शहरांमध्ये पायाभूत सुविधा गुंतवणुकीमुळे या क्षेत्राला पुन्हा उभारी मिळाली.
भारताच्या वैद्यकीय पर्यटन क्षेत्राच्या झपाट्याने वाढत असतानाच काही गंभीर आव्हाने आणि नैतिक चिंता निर्माण झाल्या आहेत. सर्वसामान्य आणि सधन वर्गामधील आरोग्य सेवा असमानता वाढली आहे. एका बाजूला अपुरी निधी असलेली सार्वजनिक रुग्णालये आहेत, तर दुसरीकडे उच्चभ्रू खाजगी हॉस्पिटल्स. या क्षेत्राचा विकास बहुतांश वेळा अनियमित पद्धतीने झाला आहे. एक मोठी कमतरता म्हणजे स्पष्ट आणि सर्वसमावेशक नियमनाचा अभाव, जिथे काही खासगी रुग्णालये धोके लपवतात किंवा सुविधा अतिशयोक्तीने सांगतात. यामुळे नैतिकतेचे प्रश्न निर्माण होतात. विविध कायदेशीर व भाषिक पार्श्वभूमीतून आलेल्या रुग्णांसाठी माहितीवर आधारित संमती आणि डेटा सुरक्षेच्या बाबतीतही चिंता आहेत.
स्पष्ट आणि सर्वसमावेशक नियमनाच्या अभावामुळे काही खासगी रुग्णालये धोके लपवतात किंवा सुविधा अतिशयोक्तीने सांगतात, जे नैतिकतेच्या दृष्टीने चिंताजनक आहे.
याशिवाय, वैद्यकीय पर्यटनाला प्राधान्य दिल्यामुळे स्थानिक आरोग्य सेवांवर ताण निर्माण होतो. अनुभवी वैद्यकीय कर्मचारी खाजगी रुग्णालयांकडे वळतात जेथे संपन्न देशी किंवा विदेशी रुग्णांना सेवा पुरवता येते, त्यामुळे सार्वजनिक रुग्णालयात मनुष्यबळाची कमतरता निर्माण होते. परदेशी रुग्णांसाठी कॉस्मेटिक सर्जरी किंवा अवयव प्रत्यारोपण अशा फायद्याच्या उपचारांवर सरकार खर्च करत असल्यामुळे प्राथमिक आरोग्यसेवा दुर्लक्षित राहते. कोविड-19 महामारीने या दृष्टीकोनाचे तोटे अधोरेखित केले आणि त्यामुळे काही काळ देशांतर्गत आरोग्य गरजांकडे लक्ष केंद्रित करण्यात आले.
भारतीय धोरणकर्त्यांनी आंतरराष्ट्रीय आरोग्यसेवेच्या व्यवसायिक संधी आणि देशांतर्गत आरोग्य गरजांमधील समतोल राखणे आवश्यक आहे. काही महत्त्वाच्या उपाययोजना म्हणजे, सोपी ई-व्हिसा प्रक्रिया आणि व्हिसा माफ करण्यासारख्या धोरणात्मक तरतुदी असलेले द्विपक्षीय करार वाढवणे, जे रुग्णांच्या प्रवासास सुलभ करतात आणि संस्थात्मक भागीदारीला चालना देतात. भारत-बांगलादेश करारामुळे सीमापार रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. वैद्यकीय व्हिसा प्रक्रिया अधिक सुधारणे देखील महत्त्वाचे आहे. 2022 मध्ये 650,000 हून अधिक वैद्यकीय व्हिसा दिले गेले असले, तरी इराण, कझाकिस्तान आणि कतारसारख्या काही देशांना ई-वैद्यकीय व्हिसाची सुविधा अद्याप उपलब्ध नाही. ही सुविधा अधिक देशांसाठी खुली केल्यास आंतरराष्ट्रीय रुग्णांसाठी मोठी अडचण दूर होईल.
भारताने जागतिक वैद्यकीय पर्यटन क्षेत्रात आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धती आणि उदयोन्मुख स्पर्धकांकडून शिकणे आवश्यक आहे. टर्की आणि दुबईने सुयोजित व्हिसा, कार्यक्षम प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय मान्यतांनी समर्थित मजबूत आरोग्य प्रणाली उभारली आहे. भारताकडे खर्चाची अनुकूलता आहे, परंतु अजूनही नोकरशाहीतील अकार्यक्षमता आणि धोरणांमधील विसंगती कायम आहेत. नुकतेच वैद्यकीय मूल्य पर्यटनासाठी INR 20,000 कोटींची गुंतवणूक जाहीर करण्यात आली आहे, जी एकात्मिक वाढीस चालना देणारी स्वागतार्ह पायरी आहे.
भारताने आपल्या प्रगत आरोग्य प्रणालीची आणि विविध उपचार पर्यायांची माहिती देण्यासाठी जाहिरात आणि जनजागृतीमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
यासोबतच, विद्यमान आजारांसाठी समग्र विमा संरक्षण, शस्त्रक्रिया आणि प्रवास खर्च समाविष्ट करणाऱ्या विमा सुधारणा रुग्णांचा अनुभव सुखकारक करतील आणि विश्वास निर्माण करतील. तसेच, भारताने आपल्या प्रगत आरोग्य प्रणालीची आणि विविध उपचार पर्यायांची माहिती देण्यासाठी जाहिरात आणि जनजागृतीमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. भारताची विशेष ओळख AYUSH (आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपथी) क्षेत्राला सरकारच्या सक्रिय हस्तक्षेपाद्वारे प्रोत्साहन देणे ही असेल.
भारतीय आणि आंतरराष्ट्रीय आरोग्य सेवा प्रदात्यांमध्ये संयुक्त उपक्रम वाढवल्यास ज्ञानाची देवाणघेवाण होऊन सेवा दर्जा सुधारेल आणि रुग्णांचा अनुभव अधिक व्यापक होईल. ‘Heal in India’ ही योजना आरोग्य मंत्रालय, आयुष मंत्रालय, CDAC आणि SEPC यांच्या सहकार्याने विकसित केली आहे. ही योजना आधुनिक व पारंपरिक आरोग्य सेवा एकत्रित डिजिटल प्लॅटफॉर्मवर सादर करण्याचा उद्देश ठेवते, जे वैद्यकीय पर्यटकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत सहाय्य पुरवते. या प्रयत्नांना चालना देण्यासाठी, भारताने PPP (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) मॉडेलद्वारे आरोग्य पायाभूत सुविधा क्षेत्रात परकीय थेट गुंतवणुकीला प्रोत्साहन द्यावे, जे थायलंडसारख्या वैद्यकीय पर्यटन आघाडीदार देशांनी यशस्वीरीत्या राबवले आहे.
शेवटी, भारताच्या वैद्यकीय पर्यटन धोरणाचा कल तीन संभाव्य फायदेशीर बाजार विभागांकडे असावा: (1) SAARC व आग्नेय आशियाई राष्ट्रे, (2) मध्यपूर्व व आफ्रिका, आणि (3) युरोप व उत्तर अमेरिका. हे एकात्मिक धोरण बाजारपेठेच्या नेतृत्वाखाली राबवले गेले, तर भारत 2026 पर्यंत 13 अब्ज अमेरिकन डॉलर्स वैद्यकीय पर्यटन बाजार उभारू शकतो, ज्यामुळे तो परवडणारी, उच्च दर्जाची व संस्कृतीशी सुसंगत आरोग्यसेवा देणारा जागतिक केंद्र बनू शकेल. महामारीनंतर जग जेव्हा आरोग्यसेवेची नव्याने पुनर्रचना करत आहे, तेव्हा भारताकडे सहवेदना, समावेशकता आणि नवोपक्रम यांच्याद्वारे नेतृत्व करण्याची संधी आहे. हा मार्ग केवळ भारताच्या अर्थव्यवस्थेसाठीच नव्हे, तर आपल्या सीमांच्या आत उपचार आणि आशा शोधणाऱ्या लाखो जीवांसाठीही आशादायक आहे.
निसा अरोरा या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या हेल्थ इनिशिएटिव्ह विभागात रिसर्च इंटर्न आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Nysa Arora was a former Research Intern with the Health Initiative at the Observer Research Foundation. ...
Read More +